15 मे अंतिम मुदत, पालिका प्रशासन सतर्क
। पेण । वार्ताहर ।
मान्सूनचे आगमन वेळेच्या अगोदरच होणार असल्याचे संकेत हवामान विभागाचे दिले आहेत. दरवर्षी साधारण 7 जूननंतर पावसाचे आगमन होते. त्यापूर्वीच नाले सफाईची कामे करण्याकडे नगर परिषदेचा कल असतो. पण पेण नगर परिषद याला अपवाद ठरली असून, प्रशासक जीवन पाटील यांनी महिन्यांअधीच पेण शहरातील नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. ज्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून पेणनगरपालिकेचे कारभार सत्ताधारी करत होते. त्या वेळेला नालेसफाई हवी तशी होत नव्हती. परंतु प्रशासक म्हणून पाटलांनी कार्यभार हातात घेतल्या पासून पेण नगरपालिकेच्या ठेकेदारांना सुतासारखे सरळ केले आहेत. त्यामुळे या वर्षी मे च्या पहिल्या आठवडया पासूनच नालेसफाईला सुरूवात झालेली आहे.
यंदा पावसाची टक्केवारी सरासरी 99 ते 100 टक्के वर्तविण्यात आली आहे. दरवर्षी शहराच्या उंबरठयावर असलेली भोगावतीनी रौद्ररुप धारण करत असते. त्यामुळे शहराला पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी मुख्य नाले, अतंर्गत नाल्यांची सफाई झाली नसल्याने घरामध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. या आपत्तीत नागरिकांचे मोठे नुकसान असल्याने पालिका प्रशासन यंदा आधीच सतर्क झाले आहे. याच अनुशंगाने शहराबाहेरील मुख्य नऊ नाल्यांमधील गाळ, कचरा काढण्याला सुरुवात झाली असून, संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.
शहरात दहा प्रभाग आहेत. यात छोटे नाले संख्येने जास्त असल्याने 30 कर्मचारी कार्यरत आहेत. तर मुख्य नाल्यांमध्ये नवीन वसाहत ते झी गार्डन्स, झिराळ आळी ते रवीराज फार्म, सागर सोसायटी ते गोदावरी नगर, गोदावरी ते पेण कार्ट, आरटीओ ते पिंपळडोह, मॅगोसिटी ते भोगावती आणि चिंतामणी सोसायटी ते भोगावती नदी अशा मुख्य नाल्यांची सफाई केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे भोगावती नदीला मिळणार्या नाल्यामध्ये आरटीओ चिंतामणी बिल्डींगपासून पिंपळडोह, मॅगोसीटी आरटीओचा मागचा भाग या पासून विश्वेश्वर आणि नंतर हुडको मार्गी राष्ट्रीय महामार्गावरील पुल अशा तीन ठीकाणी पेण शहरातील सांडपाणी भोगावतीमध्ये जातो. तर गोदावरी सोसायटी पासून कोर्टाच्या शेजारून एक नाला तर दुसरा कोळीवाडा, झिगार्डन मागून दुसरा नाला, पाटणोली गावच्या खाडीला मिळते. या पाचही नाल्यांचे साफसफाईचे काम जेवढे लवकर होईल तेवढया लवकर करणे गरजेचे आहे. अन्यथा यंदाही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्या शिवाय राहणार नाही.
वेळेआधीच एप्रिल महिन्यापासूनच शहर अंतर्गत व शहराबाहेरील मुख्य नाले साफ होणे गरजेचे असते. नाले सफाईचे काम प्रत्येक प्रभागनिहाय करण्यासाठी निरीक्षकांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार 15 मे पर्यंत नाले सफाईचे काम वेळेआधी पूर्ण होईल. गाळ थेट कचराभूमीवर शहरातील दैनंदिन 12 मेट्रिक टन कचरा दररोज डंम्पर, ट्रॅक्टरमधून आंबेगाव येथे जातो. त्याच्यावर शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट केले जाते. तसेच कचरा विलगीकरणासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच शहरातील नाल्यांमधून निघणार्या नाल्यातील गाळ देखील संकलित केला जात आहे. – जीवन पाटील, मुख्यधिकारी, पेण न.प.