। महाड । चंद्रकांत कोकणे ।
मुंबई- गोवा महामार्गावर महाड तालुक्यांतील दासगाव गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि.25) मध्यरात्रीच्या सुमाराला मुंबईकडे जाणार्या बलेनो कारला बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हे सर्व प्रवासी एकाच घरातील असुन कणकवली येथील लग्न समारंभानंतर मुंबईकडे जात असताना हा अपघात दासगाव गावाच्या हद्दीत झाला.
मुंबई- गोवा महामार्गावर दासगाव गावाच्या हद्दीत मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी बस क्रमांक एमएच-48 बीएम 6299 आणि मुंबईकडे जात असलेली बलेनो कार एमएच-5 डीएस-6861 ही विरुध्द दिशेला जोराने धडकली. कारमधुन पाचजण प्रवास करीत होते. या अपघातामध्ये कारमधील संदीप सिताराम पाटील (वय 40, रा. कल्याण) हे जागीच ठार झाले. तर साधना निलेश राऊत (वय 45 रा.जोगेश्वरी, मुंबई) सुगंधा सिताराम पाटील (वय 70 रा.कल्याण) आणि अनिल दत्ताराम राणे (वय 45, रा. जोगेश्वरी, मुंबई) यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या अपघातात बलेना कारमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून कार चालक दिपक सिताराम पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलेनो कारमधील सर्व प्रवासी मुंबईतील असुन कणकवली येथे एका लग्न समारंभाकरीता गेले होते. कार अपघातात दिपक पाटील आणि संदीप पाटील हे दोघे सख्खे भाऊ असुन त्यातील दिपक पाटील गंभीर जखमी झाले आहेत. सोबत प्रवास करीत असलेली महिला या दोघाची बहिण असल्याची माहिती मिळाली असुन पोलीस या अपघताची पुढील चौकशी करीत आहेत.