। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा शहरातील विविध बँकेत कर्मचार्यांकडून सर्वसामान्य खातेदारांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यातच बँकेतील इंटरनेट सेवा धिम्यागतीने सुरू असते किंवा काही वेळा पुर्णतः बंद असते. अशा कारणांमुळे खातेदारांना आपलीच जमा राशी मिळत नसल्याने नियोजित कामासाठी हवी असणारी रक्कम न मिळाल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऐन लग्नसराई असल्याने वधू-वर पक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. मोहोपाडा येथील नव्या जागेत स्थलांतर झालेल्या बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले वीस दिवस नेट नसल्याने खातेदारांना चक्रा माराव्या लागत आहेत. यामुळे खातेदारांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. शिवाय शाखा व्यवस्थापक, शाखाधिकारी, खजिनदार, लेखापाल, वरिष्ठ लिपिक अशा घटकांकडून मिळणार्या अपमानास्पद वागणुकीमुळे येथील खातेदार कंटाळले आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जावे, अशी मागणी खातेदारांकडून होत आहे.