| पनवेल | वार्ताहर |
गणेशोत्सवामध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडे अपुरे पोलीस बळ असल्याने पनवेल महापालिकेने अतिरिक्त मदतनीस सुरक्षा रक्षक देण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी तातडीने महाराष्ट्र सुरक्षा दलाकडीले 60 सुरक्षा रक्षक दिले होते. सध्या हे 60 सुरक्षा रक्षक पनवेल महापालिकेच्या ताफ्यात तैनात झाल्यानंतर त्यामधील 45 सुरक्षा रक्षक नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने पनवेल पालिका क्षेत्रातील विविध वाहतूक पोलीस ठाण्यांमध्ये हे सुरक्षा रक्षक कर्तव्यावर पाठविल्याने सध्या हेच सुरक्षा रक्षक पनवेलच्या चौकाचौकांत वाहतूक नियमन करताना दिसत आहेत.
शहरामध्ये सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी हा मुख्य प्रश्न ठरत असतो. शहरात वाहनतळांसाठी आरक्षित जागा नसल्याने तालुक्याची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या शहरात वाहने उभी कुठे करावी, असा प्रश्न निर्माण होतो. पोलिसांच्या मदतीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी पनवेल पालिकेने पुढाकार घ्यावा, यासाठी भारतीय जनता पक्षाची पनवेल महापालिकेत सत्ता असताना पालिकेच्या सभागृहात यावर चर्चा झाली. त्यानंतर विरोधी व सत्ताधारी बाकांवरील सदस्यांचे एकमत झाल्यावर सुरक्षा रक्षक नेमण्याचे ठरले. एकमताने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला. यासाठी महिन्याला 12 लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. वर्षाला 1 कोटी 44 लाख रुपये पालिका वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदतनीस पोलिसांना देणार आहे. यामधील 45 जवान वाहतूक पोलिसांकडे तर 15 सुरक्षा रक्षक पालिकेकडे काम करणार आहेत.