मंत्री गोगावलेंच्या समर्थकांमध्ये नाराजीची लाट
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाच्या शासकीय ध्वजवंदनावरून पुन्हा राजकीय वाद चिघळला आहे. अलिबाग येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची निवड झाल्याने रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांची अपेक्षा पुन्हा एकदा भंग झाली आहे.
रायगड जिल्ह्यात 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात शासकीय ध्वजवंदनाचा सोहळा पार पडणार आहे. या महत्त्वाच्या सोहळ्याचा मान यंदा ही महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाच देण्यात आला आहे. त्यामुळे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही मिटलेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी आणि शिंदे गट शिवसेना यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे जिल्ह्याला अद्याप स्थायी पालकमंत्री मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा कारभार पालकमंत्रीविना चालत असल्याचे वास्तव आहे. वरकरणी सर्व काही सुरळीत असल्याचा दावा महायुतीतील दोन्ही गटांकडून केला जात असला, तरी पालकमंत्री पदावरून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.
प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्य दिन या राष्ट्रीय सणांनिमित्त ध्वजारोहणाचा मान परंपरेनुसार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिला जातो. मात्र, रायगडमध्ये पालकमंत्री नसल्यामुळे हा मान वारंवार मंत्री अदिती तटकरे यांना दिला जात आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती.
या नाराजीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मान भरत गोगावले यांना देण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र दिनालाही हा मान त्यांनाच मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, शासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशानुसार यंदाच्या महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा अदिती तटकरे यांनाच देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून, महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे ‘सर्व काही सुरळीत’ असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे अशा निर्णयांमुळे स्थानिक पातळीवरील असंतोष उघड होत आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणारा शासकीय सोहळा हा प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे या मानावरून सुरू असलेली रस्सीखेच ही केवळ औपचारिकतेपुरती नसून, राजकीय वर्चस्वाचे प्रतीक मानली जात आहे. यामुळे येत्या काळात रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






