। मुंबई । प्रतिनिधी ।
सरकारकडे कर्मचार्यांच्या पगारासाठी निधी नाही; परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच, स्वतःचा स्वार्थ साधणारे हे सरकार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, एसटी कर्मचार्यांना 56% च पगार दिला जात असल्याचे गेल्या आठवड्यात आपण पाहिलेच, तसेच महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी कर्मचार्यांबद्दल होणार असे दिसत आहे. तसेच, सरकारकडे कर्मचार्यांच्या पगारासाठी निधी नाही, शेतकरी आत्महत्या वाढल्या असताना शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी निधी नाही, लाडक्या बहीणींना निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निधी नाही, आरोग्य व्यवस्था, औषधांचा पुरवठा ह्यासाठी निधी नाही. परंतु, मंत्र्यांच्या पगारासाठी निधी आहे, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी निधी आहे, उपमुख्यमंत्री कोल्हापूरात म्हणाले तसे मंत्र्यांच्या ताफ्यातील नवीन गाड्या खरेदीसाठी निधी आहे, लाडक्या कंत्राटदारांसाठी निधी आहे, भव्यदिव्य सोहळ्यांसाठी निधी आहे, जाहिरातींसाठी निधी आहे. नवीन एसटी बसेस घेण्यासाठी, म्हणजेच कंत्राटांसाठी निधी आहे. यातून काय दिसते आहे? निवडणुक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले हे सरकार जनतेचे भलं करणारे सरकार नसून, स्वतःचा स्वार्थ साधणारे सरकार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.