जिल्हाधिकारी जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार अंमलबाजणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन कामाला लागले आहे. या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार कृती आराखडा तयार करून सर्व विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान, या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवणे. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमार्फत कार्यवाही केली जाणार आहे. मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत केला जाणार आहे.
मतदान प्रवृत्तीसाठी विशेष मोहिम रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाडे, वाड्या, वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. रोजंदारीवर जाणाऱ्या मतदारांना पगारी सुट्टी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या जिल्ह्याबाहेरील मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप करून त्यांनादेखी मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.