खराब रस्ते दुरुस्ती, अपूर्ण कामांची पूर्तता होण्याची अपेक्षा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
लोकसभा निवडणुकांमुळे मुदत संपलेल्या 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींवर आता प्रशासक राज सुरु झाले आहे. गावे, वाड्यांतील खराब रस्ते, अपूर्ण स्मशानभूमी, वैयक्तिक स्वच्छतागृहांचे अनुदान, अशी अनेक अपूर्ण कामे प्रशासकाकडून पूर्ण होण्याची अपेक्षा नागरिकांना आहेत. ही अपेक्षा पूर्ण करण्यास प्रशासक यशस्वी ठरेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्या रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नऊ ते 23 फेब्रुवारी या कालावधीत झाला. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, ही अपेक्षा पूर्णतः भंग झाली आहे. अलिबागमधील 34, मुरूड चार, पेण 18, पनवेल 15, उरण चार, कर्जत 30, खालापूर तीन, रोहा 26, सुधागड सहा, माणगाव 21, तळा 18, महाड 30, श्रीवर्धन 16 व म्हसळ्यामधील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक लागण्याची शक्यता होती. त्याची तयारीदेखील गावपातळीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुरू केली होती. वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, 16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. सरपंच व सदस्यांचा ग्रामपंचायतीवरील कार्यकाळ संपल्याने आता ग्रामपंचायतींवर प्रशासकाद्वारे कारभार करण्यास सुरुवात केली आहे. विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी प्रशासक म्हणून कामकाज पाहात आहेत.
रायगड जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील रस्ते, गावांतील स्मशानभूमी, स्वच्छतागृहाचे अनुदान, घरकुल योजना, जलजीवन, पूल आदी रखडलेल्या वैयक्तिक व सामूहिक योजना प्रशासकामार्फत पूर्ण होण्याची अपेक्षा गावातील नागरिकांना आहे. ही रखडलेली कामे प्रशासक मार्गी लावण्यात यशस्वी होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट सुरु झाले आहे. सध्या पाण्यासाठी गावे, वाड्यांमधील नागरिकांना विशेष करून महिलावर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने माती व गाळमिश्रीत पाणी नळाद्वारे येत आहे. गावांतील नागरिकांना शुद्ध पाणी देण्याबरोबरच मुबलक पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावणे व गावभेटी देऊन तेथील समस्या सोडविण्यास प्रशासक यशस्वी ठरतील का, असा सवाल नागरिकांकडूनच उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत ग्रामपंचायतीचा कारभार सुरु करण्यात आला आहे.
राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद