पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावल्यानंतर सत्ताधारी भाजप ताळ्यावर आल्याचे चित्र असून, नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पहिली सही पीएम किसान योजनेच्या फाईलवर केल्याचे दिसून आले. एमएसपी कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन करत गेल्या टर्ममध्ये मोदी सरकारला धारेवर धरले होते. शेतकऱ्यांचे हे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने हाणून पाडण्याचा प्रयत्न झाला. यामुळे निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर भानावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपधविधीनंतर पहिली सही शेतकऱ्यांसाठी करावी लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी म्हणजे पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. नव्या सरकारमधील शेतकऱ्यासांठीचा हा पहिला हप्ता आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजना म्हणजेच शेतकरी सन्मान निधी ही योजना 2019 पासून सुरू झाली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना दिला जाणारा हा 17 वा हप्ता असेल. या योजनेनुसार दरवर्षी शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. वर्षाला एकूण सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना केंद्र सरकारद्वारे करण्यात येते.
मोदी यांनी या योजनेच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी दिल्यामुळे साधारण 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता 2000 रुपये येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना एकूण 20 हजार कोटी रुपये दिले जातील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात या योजनेची सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा 16 वा हप्ता आला होता.