चित्रलेखा पाटील, अॅड. मानसी म्हात्रे यांच्याकडून कौतुक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आगरी अस्मिता साहित्य संमेलन गुरूवारी (दि.10) भुतान देशामध्ये पार पडले. कवितांसह परिसंवाद चर्चेतून वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांची मेजवानी मिळाली. त्यामुळे आगरी बोलीचा डंका भुतान देशात वाजला आहे. आगरी साहित्य संमेलन भुतान देशामध्ये घेऊन आगरी संस्कृतीचे दर्शन घडवून दिल्याने शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे व शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कौतुक केले आहे.
साहित्यिक अमृत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भूतान देशाच्या फ्रुयेंशियल या शहरात तिसर्या आगरी अस्मिता साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन कवयित्री स्मिता वाजेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्घाटनपर भाषणात स्मिता वाजेकर म्हणाल्या की, आगरी बोलीभाषेचा डंका आज भूतान देशात जोराने वाजतो आहे. सातासमुद्राच्या सीमा ओलांडून चीन देशाच्या जवळ आम्ही अभिमानाने आगरी झेंडा फडकवला आहे. पुढे अध्यक्षीय भाषणात अमृत पाटील म्हणाले की, ज्याच्या नावातच आग आहे, असा आमचा आगरी समाज सर्व क्षेत्रात चौखूर प्रगती करीत आहे. साहित्य क्षेत्रामध्ये तर आम्ही जगाला गवसणी घातली आहे. मॉरिशस, थायलंड आणि आता भूतान अशा देशांच्या भूमीवर आगरी साहित्य संमेलने घेऊन जगाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे. आगरी बोलीमधील साहित्य हे खरेखुरे अस्खलित भारतीय साहित्य आहे. असे एक ना एक दिवस सारे जग बोलेलच, असा मला विश्वास आहे.
प्रास्ताविक भाषणातून कैलास पिंगळे म्हणाले की, दक्षिणेत रावणाची लंका, आम्ही भूतानमध्ये वाजवतोय आगरी डंका! आगरी बोलीमधील लोकगीते, धवळगीते, आगरी बोलीतून भाषण, आगरी पोषाख सारेच आगरीमय करुन भूतान देशात आगरी झेंडा फडकवण्याचे काम आम्ही केले आहे. दिनानाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेला परिसंवाद खूप रंगला. आगरी साहित्यिकांची उत्तूंग झेप कशी आणि किती, या विषयावर चारुशीला म्हात्रे, गजानन म्हात्रे व अनिल ठाकुर यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडतांना आगरी साहित्यिकांची लेखणी लवकरच जगाला गवसणी घालेल, असे मत प्रकट केले आहे.
अत्यंत उत्साहात व आनंदात हे संमेलन साजरे व्हावे यासाठी नरेश पाटील, पार्वती पाटील, शुभदा पाटील, सुवर्णा पाटील, अथर्व पाटील, आदिती पाटील, आरती पाटील यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन अनिल वामन ठाकुर यांनी केले.
दर्जेदार पुस्तकांना साहित्य पुरस्कार
संमेलनादरम्यान अमृत पाटील लिखित ‘बोसका’ काव्यसंग्रह, गजानन म्हात्रे लिखित ‘कहर’ काव्यसंग्रह व अनिल ठाकुर लिखित ‘बाबा’ काव्यसंग्रह अशा तीन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते या प्रकाशन करण्यात आले. तसेच, कैलास पिंगळे लिखित ‘फसकी’ कादंबरी, नरेश पाटील लिखित ‘आगरी कोळी संस्कृती’, स्मिता वाजेकर यांचा ‘वास्तव’ कथासंग्रहालय, गजानन म्हात्रे लिखित ‘विमानतळ एक संघर्ष’ या कादंबरीला व अमृत पाटील लिखित ‘इतिहास नवी मुंबईचा’ या दर्जेदार पुस्तकांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कवितेचा जागर हृदयस्पर्शी ठरला
भूतानची राजधानी थिम्फू शहरात आगरी बोलीतील कवितेचा जागर हृदयस्पर्शी ठरला. भूतानवासीयांनी टाळ्यांचा कडकडाट करुन कवितेला उस्फूर्तपणे दाद दिली. कैलास पिंगळे, रेखा थळे, शोभा पाटील, दिनानाथ पाटील, चारुशीला म्हात्रे, स्मिता वाजेकर, अमृत पाटील, गजानन म्हात्रे, दिलीप पाटील, आनिल ठाकुर या सर्वांनी आगरी बोलीमधील कवितांचे पुष्प गुंफून वातावरण मंत्रमुग्ध करुन सोडले.