| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुका भाताचे कोठार असून या तालुक्यातील शेती हि संकटात सापडली आहे. सततच्या पावसामुळे भाताचे मोठे क्षेत्र हे ओसाड राहिले आहे. त्यातही जुलै 2023 पर्यंत पावसाने चांगली बॅटिंग केली होती आणि जमीन ओसाड जाऊन देखील चांगले पीक शेतात आज तरी उभे आहे. मात्र त्यासाठी थोडा पाऊस होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. तालुका शेती प्रधान तालुका समजला जातो. या तालुक्यात औदयोगिक वसाहती नसल्याने कर्जत तालुक्यात आजही शेती टिकून आहे.तालुक्यात तर 10 हजार हेक्टर जमिनीवर खरीप हंगामात भाताची शेती केली जात आहे. बहुसंख्य शेतकरी हे प्रयोगशील शेती करीत असल्याने यावर्षी शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे भाताची पिके संकटात आले आहे. कर्जत तालुक्यातील यावर्षी जून अखेरीस पाऊस सुरु झाला आणि जुलै महिन्यापर्यंत पाऊस सतत कोसळत होता. त्याचा परिणाम भाताची रोपे हि शेतातच कुजून गेली आणि शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची शोधाशोध करून आपल्या शेतात भाताची लागवड पूर्ण करून घेतली. त्यात इकडून तिकडून भाताची रोपे शोधून आणत शेतीमध्ये भाताची लागवड केली. मात्र तरीदेखील तब्बल 25 टक्के जमीन भाताची ओसाड राहिली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी संकटात आला होता. पण त्यानंतर पावसाच्या संततधारेमुळे शेतातील 75 टक्के भाताची पिके हि चांगली बहरली होती. त्यामुळे बळीराजा आजपर्यंत खुश आहे.
मात्र तालुक्यात पूर्ण ऑगस्ट महिन्यात जेमतेम 200 मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे शेतकरी आपली बहरात असलेली शेती फुकट जात असताना पाहू लागला आहे. कर्जत तालुक्यात तीन दिवसाचा कालावधी सोडला तर पावसाने सतत विश्रांती घेतली होती. त्याचा परिणाम कर्जत तालुक्यात भाताची रोपे सुकू लागली आहेत. तालुक्यातील पाऊस नसल्याने पाणीच राहिले नाही. त्यामुळे भाताची रोपे पिवळ्या रंग धारण करू लागली आहते. त्याचा परिणाम आणखी कर्जत तालुक्यातील भाताची शेती फुकट जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष पावसाच्या पाण्याकडे लागले आहेत. शेतकऱ्यांना या आठवड्यात दैवी चमत्कार होऊन पावसाची जोरदार हजेरी लागली पाहिजे तरच खरीप हंगामातील भाताची शेती वाचणार आहे. तालुक्यातील ओलमन पासून कशेळे आणि कशेळे पासून बीड पर्यंत भाताच्या शेतामध्ये पाणीच राहिलेले नाही. त्यात डोंगर भागातील जमीन वगळता अन्य भागात शेतामध्ये पाणी उरले नाही.
खोडकिड्याचा परिणाम
कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब मुरबाड रस्त्याच्या बाजूबाजूला असलेल्या जमिनीमधील भाताच्या शेती मध्ये भाताच्या पाती लालसर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाणी शिल्कक नसलेल्या जमीनीत कोरड्या झालेल्या भाताच्या शेतातील रोपांवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रोपे वाचविण्यासाठी धडपड सुरु झाल्याचे चित्र आहे.