| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली वसाहत ही सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेली आहे. महानगरपालिकेमध्ये ही वसाहत अंतर्भूत होण्यापूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीवर लालबावटा डौलाने फडकत होता. अशातच काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व मित्रपक्ष आमच्यासोबत असल्याने महाविकास आघाडीची वज्रमूठ प्रस्थापितांना दणका देण्यासाठी सज्ज झाली आहे. विद्यमान खासदारांनी कळंबोली वसाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा घणघात शेकापचे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी केला. कळंबोली विभागात आमचे असलेले प्राबल्य पाहता सत्ताधार्यांनी कळंबोलीमध्ये ढुंकूनदेखील पाहिलेले नाही, असा आरोपही भगत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, मावळ मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांच्या विरोधात असलेले वातावरण चांगलेच तापले आहे. नुकताच पनवेल कळंबोलीमधील गुरुद्वाराचे प्रधान यांनी संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकल मराठा समाजाने महायुतीने फसवल्यामुळे मनातील खदखद व्यक्त करत महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांची धडधड नक्कीच वाढलेली असणार.
ते म्हणाले की, कळंबोली वसाहत ही सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेली आहे. महानगरपालिकेमध्ये ही वसाहत अंतर्भूत होण्यापूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीवर लालबावटा डौलाने फडकत होता. अशातच काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व मित्रपक्ष आमच्यासोबत असल्याने महाविकास आघाडीची वज्रमूठ प्रस्थापितांना दणका देण्यासाठी सज्ज झाली आहे. विद्यमान खासदारांनी कळंबोली वसाहतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा घणघात रवींद्र भगत यांनी केला. ते म्हणाले की कळंबोली विभागात आमचे असलेले प्राबल्य पाहता सत्ताधार्यांनी कळंबोली मध्ये ढुंकून देखील पाहिलेले नाही.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जेथून सुरू होतो ती ही कळंबोली वसाहत. आशिया खंडातील सगळ्यात मोठे लोखंड व पोलाद बाजार आवार या वसाहतीमध्ये आहे. या ठिकाणी असणारे स्टील मार्केट व अन्य गोदामे यामध्ये काम करणारा फार मोठा कामगारवर्ग कळंबोली वसाहतीमध्ये राहतो. मूळ कळंबोली गाव, कष्टकरी व मध्यम उत्पन्न गटातील नागरिक, आणि उच्चभ्रू नागरिक असे संमिश्र जनजीवन याठिकाणी गुण्या गोविंदाने राहात असले तरी त्यांच्यादेखील अनेक प्रलंबित समस्या आहेत. सत्तेमध्ये असो अगर नसो आम्ही नेहमीच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी खंबीरपणे उभे असतो, असेही भगत म्हणाले.
संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी मतांचा जोगवा मागत असताना विद्यमान खासदारांच्या प्रति जनता नाराज असल्याचे प्रकर्षाने जाणवते. आम्ही मात्र सातत्याने जनताभिमुख काम करत असल्यामुळे कळंबोलीवासियांची मते संजोग वाघेरे पाटील यांनाच मिळतील, असाही ठाम विश्वास भगत यांनी व्यक्त केला.