बळवलीच्या अजय पाटीलचा सूर्यनमस्कारचा विक्रम

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
बळवली ता.पेण येथील अजय कमलाकर पाटील ने अवघ्या एका तासात न थांबता सलग 1,700 भारतीय सुर्यनमस्कारचा विश्‍वविक्रम रचला. अजयच्या या दमदार व अभूतपूर्व कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतेय.
अजय च्या नावे यापूर्वी 5, 555 सुर्यनमस्कारचा देखील विक्रम नोंदला गेला आहे. तर आता पुन्हा आय. इ.ए .बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड साठी त्याने एका तासात न थांबता तब्बल 1700 जोर सूर्यनमस्कार काढून आपल्या नावे अनोखा विश्‍वविक्रम नोंदविला आहे. अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये अजय चा हा रेकॉर्ड् होत असताना बळवली ग्रामस्थानी अजयच्या गावी मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण दाखवत एकच जल्लोष व आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी व रोषणाई करीत संपूर्ण गाव प्रकाशमय केले. अजय पाटील च्या या विश्‍वविक्रमाने बळवली गावचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले. अजयच्या या यशानंतर त्याचे रायगडच्या मायभूमीत जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी अजय पाटील याने आपल्याला भेटलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सांगितले की मी रायगडची अयोध्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या बळवली गावचा रहिवाशी आहे. या क्षेत्रात सलग 12 वर्ष परिश्रम घेत आहे. रोज 12 किमी धावणे, व्यायाम व सूर्य नमस्कार चा सतत सराव करीत आहे. जोर सूर्यनमस्कार चा विश्‍व विक्रम करण्याची माझी जिद्ध होती, त्यासाठी आवश्यक ते श्रम घेतले. त्याचीच फलश्रुती होत ती ध्येय पुर्ती होऊन माझे स्वप्न साकारले याचा मनस्वी आनंद होतोय. हे यश माझे एकट्याचे नसून यासाठी मला माझे आईवडील, गुरुजन व मित्र परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले आहे. जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचे आशीर्वाद तसेच डॉ. अशोक भोईर, भूपद्रव महाराज, राजेश अंगत, सुभाष टेम्बे, नंदेश पाटील, आदींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, योगगुरू सद्गुरू स्वामी स्वीवंदा, पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावसकर, सद्गुरू योगीराज डॉ.मंगेशदा, योगगुरू डॉ अशोक भोईर, योगगुरू राजेश अंगत , मिलिंद बोचरे, विश्‍व हिंदू परिषदेचे अध्यक्ष भूपद्रव महाराज, सुभाष टेम्बे, नंदेश बळीराम पाटील, विप्रव म्हात्रे, महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत, आदित्य भाऊ पाटील उपस्थित होते.

ग्रामीण भागात राहून देखील काहीतरी हटके करण्याची जिद्ध उरी बाळगून देशपातळीवरील विक्रम नोंदवण्यासाठी अजय पाटील ने घेतलेले अविरत श्रम वाखाणण्याजोगे व कौतुकास्पद आहेत. सूर्यनमस्कार चा अनोखा विश्‍वविक्रम नोंदला गेला. अजयच्या या कर्तृत्वाने रायगडसह देशाचे नाव उंचावले. – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री

Exit mobile version