| मुंबई | दिलीप जाधव |
मुंबई – गोवा महामार्ग पूर्ण व्हावा, यासाठी आगामी अधिवेशन काळात आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पवार पुढे म्हणाले की, नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक खात्याचे आठ वर्ष मंत्री आहेत. युपीए सरकार असल्यापासून काम सुरू आहे. त्याबद्दल एक पुस्तकच लिहिले पाहिजे. बॉम्बे टू गोवा जसा सिनेमा होता तशापध्दतीने एक बॉम्बे टू गोवा पुस्तक लिहिले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली. या महामार्गाच्या कामासाठी कशाकरता वेळ लागतोय माहित नाही. मुंबई – गोवा हा महामार्ग लवकर झाला पाहिजे. नितीन गडकरी यांना मी नागपूरला भेटल्यावर तिसरा डोळा उघडा असे सांगणार आहे, असा उपरोधिक टोला पवार यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्य येत आहे. त्यामध्ये अशी वक्तव्ये अजिबात करण्याची गरज नाही. तरीही अशाप्रकारची वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते आहे. याबाबत पवारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून वाचाळवीरांना आवरा असे सांगितले होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टिका टिपण्णी होत नव्हती. अशापध्दतीचे महाराष्ट्राने ऐकले नाही किंवा खपवूनही घेतले नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आता तर वरीष्ठ पदावर बसणारी महत्त्वाच्या व्यक्तींना तारतम्य राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्त्यांना बोलण्याचे तारतम्य राहिलेले नाही. आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी, कार्यकर्त्यांनी कायदा, नियम, संविधान या सगळ्या गोष्टी काय सांगतात याचा अभ्यास केला पाहिजे, लक्ष दिले पाहिजे. अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी व्यक्त केली.