माथेरानच्या जंगलात अळंबीचा हंगाम सुरू

पहिल्या पावसात खवय्यांसाठी पर्वणी; आणखी दोन आठवडे चंगळ !
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील पहिला पाऊस हा येथे येणार्‍या पर्यटकांसाठी व माथेरानकरांसाठी आनंदाचे शिंपण करतो. यात रिमझिम पडणार पाऊस, त्यामुळे येणारा येथील मातीचा गंध, येथे पसरणारे दाट धुके आणि याबरोबरच इथल्या जंगलात उगवणारी अळंबी हे येथील माथेरानच्या पहिल्या पावसाचे वैशिष्ट्य आहे. पावसाचे आगमन झाल्यापासून पुढचे दोन ते तीन आठवडे जंगलात निसर्गाचे देणे असलेली ही अळंबी नजरेस पडते.
जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये पांढरी शुभ्र अळंबी उगवते. पांढर्‍या शुभ्र रंगाच्या अत्यंत छोट्या छत्रीच्या आकाराच्या अळंबीची चव येथील सर्वच आबालवृद्धांच्या जिभेवर रेंगाळत राहते. काही तज्ज्ञांच्यामते अळंबी ही हरित द्रव्यविरहित बीज धारण करणारी बुरशी आहे. अळंबीस भुछत्र असेही म्हणतात. पुरातन काळापासून संस्कृतमध्ये ‘कूसुंप’ आणि पौराणिकग्रंथात ‘भुछत्र’ म्हणून अळंबीचा उल्लेख आढळतो. तसेच अळंबी विषयी ‘कुत्र्याची छत्री’ अशी चुकीची कल्पना अजूनही लोकांच्या मनात आहे. अळंबीची काही विषारी प्रकार वगळता हा शक्तिवर्धक आणि औषधीयुक्त आहार आहे. या पहिल्या पावसाळ्यात कचर्‍याच्या ढिगार्‍यावर, कुजणार्‍या पाला पाचोळ्यावर, झाडाखाली, झाडाच्या बुंध्यावर अळंबी उगवते. तिचे नानाविध प्रकार आहेत. अळंबीचे फुल पूर्ण उमलण्यापूर्वी कळीची अळंबी विशेष चवीची असते.आत्ता पावसाळ्यात माथेरानच्या बहुतांश घरात अळंबीचा बेत हमखास असतो. सध्या जंगलात ठिकठिकाणी अळंबी उगविण्यास सुरवात झाली असून सकाळी लवकर उठून येथील जंगलात जाऊन अळंबी आणणे हा अनेक माथेरानवासीयांचा दिनक्रम सुरू झाला आहे. हा दिनक्रम पुढील दोन ते तीन आठवडे असाच सुरू राहणार आहे.

अळंबी उगविण्याची प्रकिया सुरू होताना अगोदर बारीक तुरा असतो, नंतर त्याची अंडी तयार होतात. नंतरची प्रक्रिया म्हणजे अळंबीचे बारीक कळ्यांमध्ये रूपांतर होते.ज्याने एकदा अळंबी खाल्ली तो पुढल्या वर्षी हमखास तिची वाट पाहतो. मुंबई, पुण्यात असणार्‍या आपल्या नातेवाईकांना अनेक माथेरानकरांकडून ही चवदार अळंबी आवर्जून पाठवली जाते.

-पवन गडवीर,
निसर्ग मित्र संस्था अध्यक्ष माथेरान


Exit mobile version