मोकाट गुरांचा ठिय्या; पादचारी, वाहनचालक त्रस्त
। मुरूड- जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड आणि एकदरा हे गाव जोडणारा समुद्र खाडीवरील एकदरा पूल राजपुरी, माझेरी, आगरदांडा, तळा, रोहा, भालगाव, टोकेखार, उसडी, सावली, मिठागर, मांदाड, म्हसळा, वाशी आदी 30 गावांसाठी जवळच्या अंतराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या या पुलावर अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. पुलावर दररोज मोकाट गुरांचा ठिय्या असल्याने पादचारी, वाहनचालक त्रासले आहेत.
या पुलावरील गुरांचे मलमूत्र, चिखल, प्लास्टिक कचरा आदींची विल्हेवाट लावणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावरील स्वच्छतेची कोणालाही चिंता पडली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरी वस्तीजवळ असणार्या या पुलाची स्वच्छता मुरूड नगरपरिषदेच्या अखत्यारीत येते, की अन्य कोणाकडे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा असून, दररोज यावरून शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने मुरूड तालुक्यातील गावे, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, आगरदांडा-दिघी प्रकल्प, जंजिरा किल्ला आदींकडे जात असल्याने या मार्गावर खूप वर्दळ दिसून येते. मोकाट गुरांची संख्यादेखील मोठी असल्याने एकदरा, मुरुडमधील ग्रामस्थांना चालताना मार्गदेखील काढता येत नाही. तीच गत येणार्या-जाणार्या वाहनांची होत आहे. अशा वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे, यावर प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करावी, अशी मागणी एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन पुलाची निर्मिती करणे गरजेचे आहे. अन्यथा जीवित, वित्तहानी किंवा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत पांडुरंग आगरकर, रोहन निशानदार आदी ग्रामस्थांनी व्यक्ते केले आहे.
पुलाची सुरक्षितता धोक्यात
1963 साली बांधकाम विभागाने या पुलाची उभारणी करून एकदरा गाव आणि मुरूड जोडले. या बांधकास आता 60 वर्षे झाली असून, ते जीर्ण झाले आहे. पुलाचे कठडेदेखील खिळखिळे झाले आहेत. सावित्री नदीवरील घटनेप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता एकदरा येथील अनेक ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली आहे