| नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन एक तप पूर्ण झाले. तरीही पळस्पे ते इंदापूर महामार्गाची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण होताना चालकांची अक्षरशः दमछाक होते. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने तत्पूर्वी रस्त्यावरील खड्डे प्राधान्याने बुजवावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोहा शाखेने दिला आहे.
गणेशोत्सवाच्यानिमित्ताने दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गक्रमण होतात. रखडलेले रुंदीकरण, पावसामुळे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा प्रवास नकोसा होतो. त्यामुळे उत्सवापूर्वी किमान महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन मनसेने पळस्पे ते इंदापूर महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना दिले आहे.
खड्डेमय मार्गातील प्रवासामुळे चालकांसह प्रवाशांना आरोग्याच्या व्याधी उद्भवतात, शिवाय अपघाताचाही धोका संभवतो, हे टाळण्यासाठी लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे तालुका माजी उपाध्यक्ष हरिश्चंद्र तेलंगे, महिला आघाडी प्रमुख दीपश्री घासे, सरचिटणीस साईनाथ धुळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.