राज्यावर अवकाळीचं संकट

6 ते 9 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यात तापमानाचा आलेख वाढत चालला आहे. विदर्भात सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. तापमानाचा पारा आता 42 अंश सेल्सिअसच्याही पलीकडे गेला आहे. तर या उन्हाळ्यात तो सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यात सहा एप्रिलपासून अवकाळीचे संकट घोंगावत असल्याची वर्दी दिली आहे. पाच एप्रिलपासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याऐवजी त्यात वाढ होण्याचीच दाट शक्यता आहे.

भारतात यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उन्हाचा कडाका सरासरीपेक्षा अधिक राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्यानेच दिला होता. महाराष्ट्रात त्याची प्रचिती येत असून तापमानात वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होत असून बुधवारी ते 42 अंश सेल्सिअसच्याही पलीकडे पोहोचले. त्यातच आता खात्याने नवा अंदाज जाहीर केला आहे. तो उन्हाचा नसून अवकाळी पावसाचा आहे. येत्या सहा ते नऊ एप्रिलदरम्यान राज्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसणार आहे. विदर्भात तापमानाचा पारा वाढत असला तरी गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या सुमारास मात्र ढगाळ वातावरण आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एकीकडे उष्णतेच्या लाटेचा इशारा तर दूसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज यामुळे राज्यातील नागरिकही संभ्रमात आहेत.

Exit mobile version