। रसायनी । वार्ताहर ।
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. आनंद महाराज खंडागळे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी श्रीनाथ आश्रम चौक येथे गुरुवार, (दि.11) एप्रिल रोजी सायंकाळी निधन झाले.
कै. आनंद महाराज खंडागळे यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार, प्रसारासाठी अर्पण केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे आनंद महाराज खंडागळे यांचं मुख्य स्रोत होतं. महाराजांना महंत, महाराष्ट्र भूषण, कीर्तन केसरी, रायगडभूषण, समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आनंद महाराज खंडागळे यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांनी स्वतः व त्यांचे सर्व भक्तगण यांचा 50 वर्षांहून अधिक सद्गुरु माऊली सेवा मंडळ केंद्र चौक, मुंबईसह कोकण विभाग अशी माऊलींची पायी दिंडी आळंदी सोहळा व पंढरपूरचा सोहळा नित्यनेमाने सुरू आहे.
विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यावर आनंद महाराजांनी आपलं आयुष्य अर्पण केलं. महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी जिल्ह्यातून नव्हे तर, राज्यातून भक्त जमत होते. अलीकडे वय झाल्यामुळे आनंद महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा मुलगा ह.भ.प. चैतन्य महाराज खंडागळे पुढे नेत आहे. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील लाखोंच्या समुदायावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर चौक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंतिम दर्शनाला हजारोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय, त्यांचे शिष्यगण, अनेक कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगमणी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी आणि समस्त वारकरी संप्रदाय राज्यातून, जिल्ह्यातून तसेच गावागावातून उपस्थित होता.