… आणि विनायक पेंटर आमदार झाला 

तुकाराम येळवे

बीड : राजेगाव (ता. केज जि. बीड) येथील अतिशय गरिब शेतकरी कुटुंबात विनायकराव मेटे यांचा जन्म झाला. त्यांची मावशी कोटी (ता. केज) येथे असल्याने बालपणापासून त्यांचे कोटी येथे येणे-जाणे होते. कोटीचे मावसभाऊ श्रीमंत डोंगरे 1979 साली मुंबईला गेले. शिक्षण कमी अन् व्यवसायिक कौशल्य नसल्यामुळे शापूरजी आणि पालनजी कंपनीने रंग देण्याचे कंत्राट घेतलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत ते काम करू लागले. रंग देण्याचे काम हिवाळा आणि उन्हाळ्यातच सुरू असते. पावसाळ्यात काम बंद असल्याने श्रीमंत डोंगरे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात गावी येत अन् दसरा होताच परत मुंबईला जात असत. 1981 साली श्रीमंत डोंगरे यांच्यासोबत वयाच्या 18 व्या वर्षी विनायकराव मेटे, त्यांचे मोठे बंधू त्रिंबक मेटे, भरत डोंगरे, तुकाराम येळवे, पांडुरंग डोंगरे, उत्तम डोंगरे, बाबासाहेब गायकवाड, पांडुरंग बहीर, बबन शिनगारे असे 35 युवक मुंबईला गेले. यावेळी शापूरजी आणि पालनजी कंपनीचेे महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीला (मशीद बंदर, मुंबई) शेडला पेंट मारण्याचे काम मिळाले होते. भिंती, पत्र्याचे शेड याला रंग देणार्‍या कामगारांना 1 रूपया हजेरी मिळत असे. चेंबूर येथे आरसीएफ कंपनीचे कलरचे काम मिळाले. येथे दोन वर्षे काम केले. यानंतर एनआरसी कंपनी (आंबेवली, कल्याण) येथे 4 वर्षे कलरचे काम केले. येथून जवळच मोहनागेट नावाचे छोटे गाव होते. मेटे यांच्यासह 35 कामगार या गावातच किरायाच्या घरात तात्पुरते स्थायिक झाले. ते सर्वजण मोहनागेट गावात 1996 पर्यंत वास्तव्यास होते. मोहनागेट गावात वास्तव्यास असताना मुलंड येथील जोशी अ‍ॅन्ड जोशी या कंपनीच्या माध्यमातून ते कलर काम करत असत. रंग कामगार म्हणून काम करत असले तरी विनायकराव मेटे खूप चंचल होते. सामाजिक प्रश्‍नांची त्यांना जाण असायची. अन्याय-अत्याचाराबद्दल ते पेटून उठायचे. मराठा समाजाच्या प्रश्‍नावर ते आवेशाने बोलायचे. मराठा समाजाच्या प्रश्‍नावरील आंदोलने, मोर्चा यात ते सहभागी व्हायचे.
मुलुंडमध्ये कामाला असताना नुकतीच अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना झाली होती. राज्यात सर्वत्र मराठा महासंघाचे काम सुरू होते. याच काळात योगायोगाने आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग घडला. केजच्या शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यक्रम होता. त्यावेळी कोटी, मस्साजोग, नांदुरघाट, राजेगाव या गावातून केजला ये-जा करण्यासाठी एकमेव केज- बोरगाव ही बस असायची. केज येथील शासकीय विश्रामगृहाजवळ बस थांबत असल्याने प्रवासी तिथे बसच्या प्रतिक्षेत थांबायचे. एके दिवशी मेटे आणि त्यांचे मुंबईतील सात-आठ कामगार मित्र बसच्या प्रतिक्षेत थांबले होते. यावेळी विश्रामगृहात गर्दी दिसली. एवढी गर्दी का? काय झाले म्हणून उत्सुकतेपोटी हे सर्वजण आत गेले.  तिथे अंबाजोगाईचे भगवानराव लोमटे (मराठा महासंघाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष) यांचे भाषण सुरू होते.सर्वांनी अर्धा तास उभे राहून भाषण ऐकले. मुंबईतील सर्व कामगार मित्रांपैकी एकमेव मेटे हे मॅट्रीक पास असल्याने सर्वजण त्यांना मानसन्मान देत असत. लोमटे यांचे भाषण झाल्यानंतर मेटे व त्यांच्या सहकार्‍यांनी भगवानराव लोमटे यांची भेट घेतली. आम्ही 35 मुंबईत असतो असे सांगत मराठा महासंघात काम करण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले. यावेळी भगवानराव लोमटे यांनी दोन दिवसांनी अंबाजोगाईला या असे सांगितले.
लोमटे यांनी बोलवले. परंतु सर्वांनी अंबाजोगाईला जायला खुप खर्च लागेल म्हणून कोणीतरी एकाने जायचे ठरले. यानंतर सर्व कामगारांनी विनायक तूच जा, आमच्यापेक्षा तूच जास्त शिकलेला आहेस. तुला चांगले बोलता येते म्हणत त्यांना राजी केले. यावेळी संघटना, राजकारण असल्या भानगडीत कशाला पडायचे? आपण खूप गरिब आहोत असेही काही जण म्हणाले. परंतु आपण एकत्र रहातो.. एका कंपनीत काम करतो, आपलेही संघटन हवे असे म्हणत कोणी एक रूपया, कोणी पन्नास पैसे तर कोणी 20 पैसे असे दहा रूपये गोळा केले. ते मेटे यांना अंबाजोगाईला जाण्यासाठी दिले. अंबाजोगाईत भेट घेतल्यानंतर भगवानराव लोमटे मेटे यांच्यावर प्रभावित झाले. यानंतर लोमटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष शशिकांत पवार यांना पत्र लिहिले. त्या पत्रात माझ्या गावाकडची फार गरीब मुले आहेत. ते मुंबईत कामाला असतात. त्यांना संघटनेच्या कामाची आवड आहेे. यातील विनायक नावाचा मुलगा संघटना जोमाने पुढे नेऊ शकतो, असा मजकूर लिहीला अन् ते पत्र विनायक यांच्याकडे दिले.
मुंबईत गेल्यानंतर महिनाभर पत्र तसेच पिशवीत पडून होते. यावेळी पुन्हा एक योग जुळून आला. विनायकराव मेटे व त्यांचे सर्व सहकारी काम करत असलेल्या जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीला मंत्रालयाच्या समोर कॉमनवेल्थ बिल्डींगच्या कलरचे काम मिळाले. यावेळी मंत्रालयाच्या जवळ आलो आहोत तर शशिकांत पवार यांना भेटून पत्र देऊ असे ठरले. मेटे, तुकाराम येळे, पांडूरंग बहीर, भरत डोंगरे या चौघांनी शशिकांत पवार यांची भेट घेतली. पत्राचा मजकूर वाचून शशिकांत पवार प्रभावित झाले. या ठिकाणी नऊ महिने काम सुरू असल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाशी विनायकराव यांचे ऋणानुबंध जुळले. संघटनेच्या माध्यमातून ते मराठा समाजाच्या प्रश्‍नावर बोलू आणि आवाज उठवू लागले. मराठा महासंघाचे कार्यक्रम, अधिवेशन याला ते आवर्जून उपस्थित रहात असत. महासंघाच्या कामात दिवसा वेळ जावू लागल्याने इकडे मोहनागेट येथील रूमवर संध्याकाळ ऐवजी सकाळी स्वयंपाक करण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतली. (त्यावेळी सर्व कामगारांना हाताने स्वयंपाक करावा लागत असे) मजूर म्हणून इकडे रंगकाम करायचे अन् जसा वेळ मिळेल तसे मराठा महासंघाचे काम करायचे, हा त्यांचा दिनक्रम सुरू झाला.
दरम्यान 1995 ला युतीचे सरकार सत्तेवर आले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. या काळात विनायकराव मेटे यांचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे व जयसिंगराव गायकवाड यांच्याशी संपर्क आला.  मेटे मुंबईतच असल्याने त्यांचा लोकनेते मुंडे यांच्याशी सतत संपर्क होऊ लागला. या संपर्कात काय झाले कळत नव्हते मात्र आम्ही सर्वजण कामावरून मोहनागेटच्या रूमवर आल्यास विनायकराव म्हणायचे ‘मी आमदार होणार!’ अन् ते आमदार होणार म्हटले की आम्हाला हसू यायचे. सारेजण पोट धरून हसायचो. विनायक रोज कामावर असतो, मजूर म्हणून आमच्यासोबत रंग देण्याचे काम करतो अन् एखाद्या दिवशी मंत्रालयात जाऊन आल्यास असे का बोलतो, असा प्रश्‍न सहकारी कामगारांना पडायचा. यामुळे मोहनागेट गावातील खोलीत राहणारे सर्व कामगार त्यांच्यावर हसायचे.
एके दिवशी जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीतील कलरचे काम संपल्यानंतर पगाराच्या निमित्ताने तेथील प्रमुख शरद जोशी यांची भेट झाली. यावेळी मेटे त्यांना ‘मी लवकरच आमदार होणार आहे’ असे त्यांना सांगितले. पगाराचे तीनशे रूपये हातात घेताना म्हटलेले हे वाक्य ऐकून शरद जोशी खळखळून हसले. ‘विनायक तू आमदार झाला तर मी तुला माझे घर मोफत राहायला देतो.’ असे ते मिश्किलपणे म्हणाले. यानंतर काही काळ गेला अन् एके दिवशी मंत्रालयात जायचे म्हणून विनायकराव मेटे मोहना गावातून गेले अन् चार-पाच दिवस परत आलेच नाहीत. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. यामुळे कामावर कसे आला नाहीत, हे विचारायची सोय नव्हती. मोहनागेट गावात जिथे विनायकराव मेटे वास्तव्यास होतेे तिथे जवळच किर्ती शहा यांचे चेतना किराणा स्टोअर्स होते. तिथे लॅन्डलाईन फोन असल्याने ते दुकान आमचा सर्व कामगारांचा कट्टा बनले होते. कोणाला फोन करायचा तर तिथून करत असत अन् आम्हाला काही निरोप द्यायचा असेल तर ते चेतना किराणा स्टोअर्स मधील फोनवर निरोप देत. दिलेला निरोप किर्ती शहा आमच्यापर्यंत पोच करायचे. विनायक का आला नाही? असा प्रश्‍न पडलेला होता. दरम्यान चौथ्या दिवशी कामावरून आल्यानंतर चेतना किराणा स्टोअर्सवर गेलो. दुकानदार किर्ती शहा कुत्सितपणे हसत म्हणाला ‘ओ तुम्हारा विनायक पेंटर का फोन आया था, बोला मै कल आमदार होने वाला हूं, शपथविधी है। एक फोन नंबर दिया है। ऊसपर फोन करके तुम्हे मंत्रालय बुलाया है’ असे म्हणत तो शेवटी खुप मोठ्याने हसला. ‘ए सही है क्या?’ म्हणत तो पुन्हा आमच्याकडेच डोळे मोठे करून पाहु लागला. यामुळे कोणता फोन नंबर दिला, या भानगडीत न पडता आम्ही सर्व सर्व कामगारांनी दुकान परिसरातून काढता पाय घेतला. कोणालाच विश्‍वास न बसल्यामुळे बीडच्या आम्हा 35 कामगारांपैकी कोणीही मंत्रालयात गेले नाही. आमच्याप्रमाणेच जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीचे मालक शरद जोशी यांना देखील मेटे यांचा फोन आला. ‘मी उद्या आमदार बनणार आहे.’ असे सांगितल्यानंतर ते मंत्रालयात गेले, असे कंपनीत कामाला गेल्यानंतर कळले पण विश्‍वास बसत नव्हता. दुसर्‍या दिवशी आमच्यापैकी कोणीतरी बाहेर गेला अन् हातात नवाकाळ पेपर घेऊन आला. धावत- पळतच तो खोलीवर आला. आपला विनायक खरच आमदार झाला, म्हणत त्याने पेपर दाखवला. बातमीची हेडींग होती, “अतिशय छोट्या गावातील रंगकाम करणार्‍या मुलाने घेतली आमदारकीची शपथ!’’ यानंतर आम्ही सर्व कामगारांनी धावत चेतना किराणा स्टोअर्स गाठले. विनायकराव मेटे यांनी कोणता नंबर दिला, याची माहिती घेतली. त्या नंबरवर फोन केला असता जोशी अ‍ॅन्ड जोशी कंपनीचे मालक शरद जोशी यांच्या घरचा तो नंबर असल्याचे समजले. सुरूवातीला जोशी यांनी आमदार मेटे यांचे बोलणे हसण्यावारी घेतले होते. परंतु विनायकराव आमदार बनणार असल्याची खात्री पटताच त्यांनी त्यांना आपले घर रहायला दिले होते.
यानंतर आम्ही विनायकराव मेटे यांच्या शपथविधीच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी मंत्रालयात जावून भेट घेतली. विनायकराव यांच्यासारखा संघर्षशिल, धाडसी, शुन्यातून विश्‍व निर्माण करणारा माणूस पुन्हा होणे नाही.
पुढे आमदार झाले तरी मेटे साहेब यांच्यातील सामान्य माणूस कायम होता. छोटी-छोटी कामे देखील ते करायचे, गोरगरीब माणसाचा फोन घायचे. लहान कार्यकर्त्याला देखील मानसन्मान द्यायचे. निमंत्रण दिलं अन मेटे साहेब आले नाहीत असं कधीच झालं नाही.
असा हा तळागाळातील माणसाचा राजबिंडा नेता आज आपल्यात नाही, यावर विश्‍वास बसत नाही.  (साभार)

Exit mobile version