| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आश्वासन देवूनही पाळले नाही व आर्थिक बजेट मध्ये या दोन घटकांचा उल्लेखही नाही, याबद्दल तीव्र संताप व्यक्त करून निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्व अंगणवाडी आणि आशा सेविका एकमताने हा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात आणि जिल्हासोबतच देशभरात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या तेरा लाख अंगणवाडी केंद्र असून, ह्या अंगणवाड्यांमध्ये तेरा लाख अंगणवाडी सेविका व तेवढ्याच संख्येत मदतनीस असूनही सेविका आणि मदतनिसांना शासन मानसेवी समजते. सरकारकडून सन 2019 पासून अंगणवाडी सेविकांना पाच हजार आणि मदतनिसांना अडीच हजार रुपये दरमहा मानधन दिले जाते. प्रचंड महागाईचा काळ असूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात अद्यापही वाढ करण्यात आली नाही. या कर्मचार्यांना कुठल्याही प्रकारचे सामाजिक सुरक्षिततेचे कायदे व किमान वेतन सुद्धा देण्यात येत नसून वेठबिगाराप्रमाणे वागविले जात असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून कोकण आयुक्तां मार्फत पंतप्रधानांना देण्यात आले आहे. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे एम.ए.पाटील, सरचिटणीस ब्रिजपाल सिंग, रश्मी म्हात्रे, दिनकर म्हात्रे आणि प्रतिनिधी जिवीता पाटील यांच्या सह अंगणवाडी तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. कोकण विभागीय आयुक्तांच्या वतीने उपायुक्त रवींद्र जाधव यांनी निवेदन स्वीकारले. प्रलंबित मागण्याचा निर्णय होईपर्यंत अंगणवाडी सेविकांना विस हजार आणि मदतीनीसांना दरमहा अठरा हजार रुपये वेतन देण्याची न्याय मागणी केली असून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अशी तरतूद करण्याची मागणी सुद्धा वतीने पदाधिकार्यांनी प्रशासनामार्फत शासनाकडे केली आहे.
अंगणवाडी सेविका ही तळागाळात काम करणारी मानधनी सेविका आहे. सध्याच्या महागाईचा विचार केला तर 8500/- आणि मदतनीस यांना 4500/- इतक्या तुटपुंज्या मानधनात काम करावे लागते. त्यातही बर्याच सेविका व मदतनीस या एकल महिला आहेत आणि त्यामुळे इतक्या कमी मानधनात त्यांना निर्वाह अनेक अडचणी येतात. त्यांना एकतर शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा द्या किंवा भरीव मानधन वाढ द्यावे, यासाठी गेले कित्येक वर्षे त्यांचा लढा सुरू आहे आणि त्यातच नवीन सरकार आल्यानंतर त्यांना आपले दिवस चांगले येतील अशी आशा निर्माण झाली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा करून येत्या 26 जानेवारीला भरघोस करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महाराष्ट्रभरातल्या सर्व सेविकांचे लक्ष 26 तारखेवर लागले होते की, आपल्याला काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. परंतु प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला कोणताही शब्द न पाळल्याने अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी याचा निषेध व्यक्त करीत अध्यक्ष महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे ए. पाटील तसेच सरचिटणीस बृजपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संप करून कामकाज बंद ठेवणार असल्याचे निवेदन दिले आहे. त्याच बरोबर जर अजूनही शासनाने लक्ष दिले नाही तर सर्व कामकाज बंद ठेवून येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, असे मत अंगणवाडी सेविका प्रमुख जिविता पाटील यांनी व्यक्त केले.