जानेवारीत हापूसची आवक; मात्र एप्रिलमध्ये तुटवडा

| नवी मुंबई | वार्ताहर |

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जानेवारीत दुसर्‍यांदा हापूसची आवक झाली आहे. जानेवारीतील ही विक्रमी आवक असल्याचा दावा व्यापार्‍यांनी केला आहे. तर दुसरीकडे कोकण पट्ट्यात काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने एप्रिल महिन्यात येणार्‍या आंब्यांचा मोहर गळून पडल्याने ऐन उन्हाळ्यात आवक घटणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाचा हापूस हा डिसेंबर मध्येच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. अर्थात हा हापूस कोकण किंवा जुन्नर पट्ट्यातून नव्हता तर आफ्रिका खंडात मलावी म्हणून ओळखला जाणारा होता. मात्र त्यानंतर त्याची आवक झाली नाही. तर दुसरी आवक हि 18 जानेवारीला झाली. अमोल शिंदे या व्यापार्‍याकडे दोन पेट्या रत्नागिरी हापूस आला होता. अशा प्रकारे कमी अधिक प्रमाणात जानेवारीत हापूस आवक होत असते. मात्र 29 तारखेला कृषी उत्पन्न बाजारपेठेत तब्बल 360 पेट्या कोकणातून आल्या. त्यात देवगड 250 पेट्या रत्नागिरी 80 पेट्या तर माणकोट येथून 40 पेट्या आल्या. आता आलेला हापूस आंब्याचा मोहोर हा गेल्या वर्षीच्या अ‍ॅाक्टोबर महिन्यातील आहे. जानेवारीतील ही आजपर्यंतची विक्रमी आवक समजली जाते. जानेवारीत आतापर्यंत केवळ 25 ते 30 पेटी हापूस आवक होत होती. मात्र आता एकदम 360 पेट्या आवक झाल्याने त्यामुळे ही विक्रमी आवक असल्याची चर्चा एपीएमसी फळ बाजारात होती. याचा दर प्रति पेटी 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत गेला आहे.

दुसरीकडे आंबा खव्वयांसाठी एक वाईट बातमी असून कोकणातील हापूस आंबा आवक एप्रिलमध्ये अत्यल्प होईल. याचे महत्वाचे कारण म्हणजे काही महिन्यापूर्वी हापूस पिकणार्‍या कोकण पट्ट्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्या पाठोपाठ थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादन खूप कमी होण्याची भीती शेतकर्‍याकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सध्या ज्या आंबा झाडांना मोहर आला आहे तो खूप चांगला असून जर काही नैसर्गिक संकट आले नाही तर मे महिन्यात प्रचंड आवक होण्याची आशा आहे, अशी माहिती फळ मार्केट व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

Exit mobile version