| पोलादपूर | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये इंडिया आघाडी झाल्याने अनंत गीते यांची उमेदवारी नक्की झाली. राज्यात महाविकास आघाडी झाली. तेव्हा विद्यमान खासदार म्हणून उमेदवारी तटकरेंना गेली असती. पण तटकरे अजित पवार गटाकडे गेले आणि गीते यांचे स्टार चांगले असल्याने त्यांची उमेदवारी चार महिने आधीच शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांनी मागितली. आता मशालीसमोर घडयाळ असल्याने गीतेंचा विजय सोपा झाली आहे. मशालीसमोर धनुष्यबाण असता तर जी धावाधाव झाली असती त्यामुळे कार्यकर्त्यांची खाज मोडली असती, असे ओघवत्या शैलीतील भाषणात शेकापक्षाचे युवा नेते अॅड.आस्वाद पाटील यांनी गीते यांच्या विजयाचा दावा चोळई येथील आघाडीच्या मेळाव्यात केला.
अनंत गीते यांची निशाणी आता मशाल आहे. आम्ही निशाणीचा बाऊ केला नाही. निशाणीवर विजय अवलंबून असता काँग्रेस सत्तेत राहिल. महाडकर कायम पुरात असतं पण ते घर सोडत नाही. राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते विचारांशी ठाम राहिले तर पक्ष सोडण्याचा प्रकार घडत नाही. तटकरेंना प्रत्येक बूथला एक मत कमी पडल्याने त्यांचा पराभव झाल्याचे जेव्हा आपण मतमोजणी दरम्यान 2014 मध्ये त्यांना सांगितले तेव्हा मतदार संघात 2200 बूथ होते. म्हणून प्रत्येक मत महत्वाचे आहे. असे आवर्जून सांगितले. शिवसेनेच्या मुळ कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन, खरी शिवसेना आणि खरी शिवसेना असे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले पण ज्यांना खरं म्हटलं त्यांच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. मग खर्या शिवसेनेची खरोखरच फसवणूक झाली, असा संदेश पोहाचविला पाहिजे, असे आवाहन यावेळी अॅड. पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अस्लम राऊत, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत, जिल्हा बँकेचे संचालक हनुमंत जगताप, धनंजय देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष कृष्णा करंजे, जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेता दिलीप भागवत, पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख अनिल मालुसरे, मुजम्मील तांबे, महंमद मुजावर, चंद्रकांत सणस तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्जे उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष वैभव चांदे यांनी सुत्रसंचलन केले.