| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगडावर गेली कित्येक पिढ्या धनगरांची घरे उभी आहेत. उन, वारा व पावसात रायगडाची संपूर्ण काळजी घेण्याचे काम येथे राहणारे धनगर समाजातील लोक करत आहेत. जेव्हा पुरातत्व खातेही या ठिकाणी अस्तित्वात नव्हते तेव्हाही हाच समाज किल्ल्याची काळजी घेत होता. असे असतानाही त्यांची घरे खाली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आपण आमरण उपोषण करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी दिला आहे.
शासनाने येथील धनगर समाजाचे अस्तित्व मान्य केले आहे. येथे राहणाऱ्या या समाजाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग म्हणजे पर्यटक आहे. पर्यटक नसतील तर त्यांची चूल देखील पेटणार नाही. तसेच, दहा वर्षे एका ठिकाणी राहिल्यानंतर शासन लोकांना एसआरएसमध्ये सदनिका देते. मात्र, रायगडावर राहणारी धनगर वस्ती दहा पेक्षा जास्त पिढ्या राहत आहेत. पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या या धनगर समाजाला वाचविण्यासाठी आ. भरत गोगावलेंना आम्ही आर्त हाक मारत आहोत. त्यांनी पुढे येऊन पुरातत्व खात्याची ही दादागिरी त्वरित थांबवावी आणि शांततेत जीवन जगणाऱ्या या धनगर समाजातील बांधवांना न्याय मिळवून द्यावा. परंतु, त्यांच्याकडून देखील याकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे येथील एकही घर तोडण्याचे पुरातत्व विभागाने धाडस केल्यास आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत, त्याची नोंद घ्यावी, असा इशारा अशोक जंगले यांनी दिला आहे.