| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-कशेळे भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे झाले आहे, असा आरोप वाकसचे माजी उपसरपंच संतोष वैखरे यांनी केला आहे. सध्या या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यावरील माती डांबरीकरण नंतर वर दिसू लागली असल्याचा त्यांचा आरोप आहे.
या मार्गावरील कुंभे फाटा ते वाकस ग्रामपंचायत हद्दीतील कोलीवली गावा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक कोटी 21 लाख खर्चून रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. सदर डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वैखरे यांनी केला आहे. या रस्त्याच्या नित्कृष्ट कामाची तक्रार बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाचे उपअभियंता संजीव वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता सदर रस्त्याचे काम हे उत्तम पद्धतीने होत असे स्पष्ट केले आहे.
डांबरीकरणाच्या कामाची पाहाणी केली असता रस्त्यावरील अंथरण्यात आलेला बीबीएम थर हा कमी असल्याचे आढळून आले आहे. तर नियमानुसार रस्त्यावरील माती आणि धुळ रस्त्यावरून बाजूला न करता डांबराचा फवारा हा कमी प्रमाणात मारत असल्याचे व त्यावर बीबीएमचा थर अंथरण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे एक कोटी 21 लाख खर्चून बनविण्यात रस्त्याच्या कामाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग करणार काय? याकडे लक्ष लागून राहिले आहे.