युती-आघाडी न करता स्वबळावर लढल्यास होणार कोंडी
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटनस्थळावर असलेल्या अगदी लहानशा नगरपरिषदेच्या सभागृहात विराजमान होण्यासाठी अनेकांना आतापासूनच दिवा स्वप्न पडत आहेत. आपल्या पक्षाची अन्य भक्कम मताधिक्य असणार्या पक्षासोबत आघाडी करून आपण अगदी सहजपणे स्वतःची दमडी सुध्दा खर्च न करता केवळ पक्षाच्या आर्थिक बळावर नगरपरिषदेच्या सभागृहात प्रवेश करून मोठळा प्रमाणावर आर्थिक सुबत्ता प्राप्त करू शकतो असे दिवसा स्वप्न पाहणारे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
अद्यापही आरक्षण जाहीर झालेले नाही, त्यामुळे निवडणुका केव्हा होतील याबाबत मतदारांसह इच्छुक उमेदवारांचा प्रचंड उत्साह वाढला आहे. काही मतदारांनी अगोदरच आपली आर्थिक गणिते मांडली आहेत. आपल्या मर्जीतील पक्षाशी आघाडी व्हावी जेणेकरून आपली पोळी भाजून घेता येईल अशी महत्वाकांक्षी मंडळी सध्यातरी मोठ्या अविर्भावात वावरताना दिसत आहेत. परंतु आगामी काळात जर कोणत्याही पक्षांच्या आघाड्या युत्या झाल्या नाहीत प्रत्येक पक्षाने परिस्थिती नुसार अथवा वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वबळावर निवडणुका लढण्याचा पवित्रा घेतल्यास या महत्वाकांक्षी मंडळींची खूपच कोंडी होणार आहे.
माथेरानच्या विकास कामांसाठी शासकीय भरीव निधी उपलब्ध होत असतो त्यातूनच सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे सर्व काही व्यवहार अवलंबून असतात. आजची येथील राजकीय परिस्थिती लक्षात घेता स्वबळावर कोणत्याही पक्षाला बहुमत प्राप्त होणार नाही. कुणाच्या तरी कुबड्यांचा आधार घेऊनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. आजवरच्या निवडणुका पाहता नगरपरिषदेच्या सभागृहातील कामकाजा बाबतीत जे काही घडत असते त्याची माहिती मतदारांना ज्ञात होत आहे. मागील पंचवीस वर्षांपासून काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. तर 1996 आणि 2016 याकाळात सत्ताधारी शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने सुध्दा मागील काळात शिवसेने सोबत सत्तेत वाटचाल केली होती. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली होती. वेळ आल्यास समविचारी पक्षांची इच्छा असल्यास त्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. 2016 मध्ये शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होते त्यामुळे कदाचित त्यांनाही कुणाच्या आधाराची आवश्यकता दिसत नाही परंतु यावेळी निवडणुकीत कुणाची तरी सोबत असावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपरिषदेच्या सभागृहात सोबत घेऊन जाण्यासाठी शिवसेनेची काही मंडळी इच्छुक दिसत आहेत. तर शिवसेनेच्या दुसर्या गोटातील मंडळींची काँग्रेस आणि भाजप, शेकापक्षा सोबत आघाडी करण्याची इच्छा दिसत आहे. गटातटाच्या या राजकरणात अखेरीस सर्वांनाच वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वबळावर निवडणूका लढवाव्या लागतात की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेत येणार्या पक्षावर आपली कमांड असावी अशी महत्वाकांक्षा बाळगणारी मंडळी कडीपत्त्याप्रमाणे दूर फेकली जाण्याची शक्यता आहे असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.