शासनाच्या तिजोरीत 34 लाख जमा; 147 जणांचा सहभाग
रसायनी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव खालापूर येथे करण्यात आला असून, सात लाखांच्या बोलीला 34 लाख मिळाल्याने शासनाच्या तिजोरीत भर पडली आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने याठिकाणी वाहनांचा मोठा प्रवास सुरु असतो. याचबरोबर या जिल्ह्यातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, म्हणजे जुना मुंबई-पुणे रस्ता, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गोवा महामार्ग, बोरघाट महामार्ग अशा मार्गांसह लहान जिल्ह्यांतील लहान-मोठे मार्ग असल्याने या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होतात.
रायगड पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार हा लिलाव खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील बेवारस 270 वाहनांचा लिलाव पार पडला. यावेळी कर्नाटक, मुंबई, नवी मुंबई, पुणे व राज्यातील परिसरातून मोठ्या संख्येने लिलाव घेणारे व्यापारी उपस्थित होते. यात हा सर्व वाहनांचा लिलाव 34 लाख 10 हजार रुपयांनी खोपोली येथील पठाण एंटरप्राइज कंपनीने घेतला आहे. यात 147 जणांनी सहभाग घेतला होता.
या लिलावाप्रसंगी खालपूरचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, पेण उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, कर्जत उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत लिलाव झाला.
रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून जवळपास 272 लहान-मोठ्या वाहनांचा समावेश होता. या लिलावाची मूळ किंमत 7 लाख होती. पहिली बोली 7 लाख 70 हजार 75 रुपयाने सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाने हात वर करून चढ्या भावाने बोली सुरू केली. शेवटी या मालाची अंतिम किंमत पठाण व्यावसायिकाने शेवटची बोली 34 लाख 10 हजात 3 रुपये जाहीर केली. त्याच्या वरचढ कोणीच बोली न केल्याने हा लिलाव महंमद सैफ उल्ला पठाण यांच्या बाजूने जाहीर करण्यात आला असून, त्यांनी या रकमेचा धनादेश तात्काळ देण्याची व्यवस्था केली. यावेळी त्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.