। सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागडातील डोंगर दर्यात वसलेल्या पडसरे गावाला जोडणार्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. कित्येक दशके जुना असलेल्या पुलाच्या सळया निघू लागल्या असून पुलाचे बांधकाम देखील पडण्याच्या स्थितीत आहे. या भागात पडसरे गाव, आदिवासी वाडी वस्त्या असे बहुसंख्य अशी लोकसंख्या असलेली गावे आहेत. या गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा हा पूल आहे. यातच गणेशोत्सव तोंडावर असून मुंबई पुण्याहून चाकरमानी लवकरच गावात दाखल होतील. पर्यायाने या पूलावरील वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. तसेच पडसरे गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्याठिकाणी मुलांचे वसतीगृह आहे. अनेक ठिकाणांहून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी राहत आहेत. त्यामुळे नेहमीच या पुलावरून विद्यार्थी व ग्रामस्थांची वर्दळ असते. अशावेळी जर का या पुलाचे बांधकाम कोसळले तर येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होईल. अशावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच पडसरे पुलाची डागडुजी करावी असे देखील नागरिकांकडून बोलले जात आहे.
कोट
सध्या पावसाळ्याचे दिवस असून एखादी दुर्घटना घडली तर अनेक गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर पुलाची दुरूस्ती होणे अपेक्षित आहे. सदर पुलाच्या दोन्ही बाजूला धोकादायक पूल म्हणून फलक लावण्यात आले असून अवघड वाहनांस मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने सदर पूल लवकरात लवकर दुरुस्त करावा – भास्कर पार्टे,
सरपंच महागाव.
कोट
जिल्हा परिषद वरिष्ठ अधिका-यांकडून सदर पुलाची पाहणी करण्यात आली असून स्थानिक ग्रामपंचायतीला अवजड वाहतूक करण्यास मनाई आदेशाचा फलक लावण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे. या पुलाचे दुरुस्ती प्रस्ताव पाठवण्यात आले असून प्रस्ताव मंजूर होताच कामे हाती घेण्यात येतील. विश्वास नाईक, बांधकाम उपअभियंता रा.जि.प., उपविभाग पेण