| पनवेल । वार्ताहर ।
तळोजा वसाहतीमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक तसेच वाहनचालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सव दरम्यान खारघरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे दिसून येत आहेत.
या रस्त्यांवरुन जाताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत असून अनेकदा अपघात होण्याची शक्यता असतानाही सिडको प्रशासन रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या खड्डयांमुळे एखाद्या निष्पापाचा बळी जाण्याची शक्याता आहे. विशेष म्हणजे तळोजा वसाहत पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आल्यामुळे सिडकोचे तळोजा वसाहतीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तळोजा वसाहतीमधील नागरिक करीत आहे.