शेतीची नांगरणी, भाताची पेरणी सुरू
95 हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भागांत शेतीची नांगरणी, भात पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकरी आपल्या कुटुंबासोबत शेतात नांगरणी व भात पेरणी करताना दिसत आहे. यंदा पावसाचे लवकरच आगमन होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांनी लगबगीने मशागतीची कामे पूर्ण केली. त्यात गेल्या काही दिवसांत पावसाची जोरदार बरसात होत असल्याने रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत आता नांगरणी, कुदळणी, पेरणीला सुरुवात झाली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये 97 टक्के शेतकरी पावसावर अवलंबून आहेत. एप्रिलपासूनच पावसाळ्यापूर्वी मशागतीच्या कामाला सुरुवात झाली होती. बांध-बंदिस्ती, गवत जाळणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी नाला तयार करणे, राब जाळणे आदी कामे मे अखेर पूर्ण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना भात पेरणीच्या कामाचे वेध लागले होते. आता पेरणीयोग्य पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील दक्षिण रायगडमध्ये नांगरणी, कुदळणी, पेरणी ची कामे करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 95 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यापैकी सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीची कामे केली जात आहेत.