शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडला लगाम

पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याची वेळ; विद्यार्थ्यांची मात्र शाळेबाहेर धाव

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या आवारात जंक फूडच्या जाहिरात व वितरणावर निर्बंध घातले आहेत. राज्यभर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून, पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीनवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधील पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे. मात्र, या निर्णयामुळे शाळेच्या बाहेर उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निर्बंध आणल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयी प्रत्यक्षात बदलणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या आवारात तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिसरात जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या जंक फूडच्या विक्री, जाहिरात व वितरणावर निर्बंध घातले आहेत. राज्यभर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून, पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीनवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, या निर्णयामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधील पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांना सहज पसंत पडणारे वडापाव, समोसा, तळलेले पदार्थ, चिप्स, शीतपेये, चॉकलेट आणि तत्सम पदार्थांऐवजी पोहे, उपमा, इडली, शिरा, फळे, ताक आणि इतर पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. मुंबईतील काही शाळांच्या कॅन्टीनमध्ये अशा प्रकारचे बदल प्रत्यक्ष करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीन चालकांसमोरही विद्यार्थ्यांची आवड आणि प्रशासनाचे आरोग्यविषयक नियमांचा मेळ घालण्याचे आव्हान उभे राहणार आहे. जंक फूडची विद्यार्थ्यांमध्ये असलेली मागणी लक्षात घेता, त्याऐवजी पौष्टिक पदार्थ विक्रीस ठेवले तरी ते विद्यार्थ्यांना कितपत आवडतील, हा देखील प्रश्न कॅन्टीन चालकांसमोर आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात जंक फूडला लगाम लागला असला, तरी शाळेबाहेरील दुकानांवर कितपत नियंत्रण येते आणि विद्यार्थी पौष्टिक पदार्थांकडे कितपत वळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, शाळेच्या कॅन्टीनमधून जंक फूड हटवले म्हणून विद्यार्थ्यांची जंक फूडची आवड तात्काळ कमी होईलच असे नाही. शाळेच्या 50 मीटर परिसराच्या बाहेर उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळेतील कॅन्टीनवर निर्बंध आणल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयी प्रत्यक्षात बदलणार का, की जंक फूड खाण्यासाठी ते शाळेबाहेरील दुकानांचा मार्ग स्वीकारणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

खाण्याच्या सवयी बदलण्याचे आव्हान
फक्त वडापाव, समोसा किंवा शीतपेय बंद करून विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयी बदलणे सोपे नाही. त्यामुळे पोहे, उपमा, इडली यांसारखे पदार्थ चविष्ट, आकर्षक आणि विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सवय लावण्यासाठी शाळा, पालक, कॅन्टीन चालक आणि प्रशासन यांच्यात समन्वय गरजेचा आहे. एफडीए कडूनही शाळांना पौष्टिक पदार्थ, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीनचा मेन्यू बदलणार असला, तरी विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याचे खरे आव्हान शाळेबाहेर आहे.
Exit mobile version