। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्यांची संख्या मोठी असते. त्यावेळी सातत्याने अपघात घडत असतात आणि त्यामुळे मध्य रेल्वेकडून रूळ ओलांडत असताना होणार्या घटना रोखण्यासाठी बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे.
कर्जत या उपनगरीय रेल्वे स्थानकात सातत्याने प्रवाशी हे रूळ ओलांडत असतात आणि त्यामुळे त्यांना सातत्याने अपघात होत असतात. या घटना सतत घडत असल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यात मध्य रेल्वे कामगारांचे नेते प्रवीण तांडेल यांना देखील आपला जीव गमवावा लागला होता. तांडेल यांच्या अपघाती निधनानंतर नेरळ आणि परिसर देखील हळहळले होते. त्यात मागील काही महिन्यात महाविद्यालयीन विद्यार्थी यांना आपले प्राण रेल्वे अपघातात गमवावे लागले आहेत. त्यात नेरळ रेल्वे स्थानकात उतरून नेरळ विद्या मंदिर हि माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी जाणारे विद्यार्थी हे स्टेट रूळ ओलांडून जात असतात. दुसरीकडे नेरळ च्या पूर्वी भागातील प्रवासी आणि नोकरदार तसेच विद्यार्थी हे देखील दररोज रूळ ओलांडून ये जा करीत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना देखील अपघात होत असतात.
मध्य रेल्वे प्रशासनाने असे अपघाती प्रकार रोखण्यासाठी रूळ ओलांडून प्रवास करणारे प्रवासी आणि रहिवाशी त्यांच्यावर काही निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ रेल्वे 500 मीटर अंतर असे बॅरिकेट उभारावे अशी मागणी होत आहे. त्यावेळी या बॅरिकेट्समुळे नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे अपघातात प्रवाशांचा बळी जाणार नाही. भिवपुरी रेल्वे स्थानकात रूळ ओलांडणारे प्रवासी यांचे बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेकडून लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तसे बॅरिकेट्स नेरळ आणि शेलू रेल्वे स्थानकात लावण्याची गरज आहे.