। उरण । विठ्ठल ममताबादे ।
सध्या शाळा सुरु झाल्याने सर्व शाळा तसेच शिकवणीसमोर आजूबाजूच्या परिसरात लहान मुले, बालके यांची खूप मोठी गर्दी दिसत असते. पालकांचीही गर्दी यावेळी दिसून येते. शाळेत किंवा शिकवणीमध्ये कोण येतात, कोण जातात याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतात. याचा फायदा मुलांना पळविणार्या टोळीने घेतला आहे. आई-वडील व्यस्त असल्याने त्याचा फायदा घेत काही अनोळखी व्यक्ती शाळेत किंवा शिकवणीमध्ये जाऊन मी मुलाला न्यायला आलो आहे, असे सांगून मुलाला जवळ घेऊन चॉकलेट, खाद्यपदार्थ देऊन, वेगवेगळे आमिष दाखवून पळवून नेत आहेत.
तुझ्या आई-वडिलांनी मला तुला न्यायला पाठविले आहे, असे सांगून सुद्धा मुलांना पळविण्याचे प्रकार उरणमध्ये सुरु आहेत. त्यामुळे पालकांना आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. लहान मुलांना चोरणारी टोळी नजर चुकवून किंवा आमिष दाखवून लहान मुलांना पळवत असल्याने उरणमध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते.
…अन् मुलाने धूम ठोकली
नवघर गावातील बस स्टॉपजवळ एक मुलगा शाळेत जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उभा होता. अचानक एक महिला त्याच्यासमोर आली आणि त्याला चाकूचा धाक दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलाने तेथून धाव ठोकून सरळ घर गाठले आणि घडलेला सारा प्रकार घरातील पालकांना सांगितला.
शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे मुलगा बचावला
उरण जेएनपीटी समोरील कॉलनीमधील एका शिकवणी वर्गात एक अनोळखी इसम जाऊन एका मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे, असे सांगू लागला. लहान मुलाने त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार दिल्यानंतर शिक्षिकेने लगेच घरी फोन केला. तेव्हा समजले की कोणत्याही माणसाला मुलाला आणायला पाठविले नाही. शिक्षिका फोनवर बोलत असताना त्या अनोळखी माणसाला संशय आला आणि तो तेथून पळून गेला.
पालकांनी खबरदारी घ्या
सर्व पालकांना विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे की सध्या सतर्क रहा. शाळेतून किंवा शिकवणीमधून मुलांना आणण्यासाठी उशीर होत असेल तर तसे वर्गातील शिक्षकांना फोन करून कळवा. शाळेत मुलाला सोडेपर्यंत व शाळा सुटल्यानंतर आपल्या मुलावर पालकांनी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकांना केली आहे.