| ठाणे | प्रतिनिधी |
नाशिक–मुंबई महामार्गावरील कसारा घाटात बुधवारी (दि.28) रोजी पहाटेच्या सुमारास चोरीने गोमांस वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोला अपघात झाला. नाशिकहून मुंबईकडे जात असताना टेम्पोचा अॅक्सेल तुटल्याने बिबळवाडी वळणावर वाहन पलटी झाले. त्यामुळे टेम्पोच्या दर्शनी भागात डाळिंबाच्या पेट्या व भाजीपाला रचून आतील भागात गोमांस लपवण्यात आल्याचे उघडकीस आले. टेम्पो अपघातानंतर डाळिंबाच्या पेट्या व भाजीपाला अस्ताव्यस्त पडला, तर अंदाजे 5-6 जणांवराचे गोमांस रस्त्याच्या बाजूला विखुरले गेले.
या वाहन अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने टेम्पो बाजूला काढला. त्यानंतर अर्धवट भरलेले गोमांस दुसऱ्या पिकअपमध्ये भरून ते चिंतामणवाडी पोलिस चौकीजवळ जमा करण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. टेम्पो चालक अपघातानंतर फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.