| पनवेल | प्रतिनिधी |
गरीब आणि मच्छिमारी करणार्या कोळी बांधवांना पनवेल महावितरणकडून न्याय मिळावा यासाठी जनता दल (सेक्युलर) 1 मे रोजी सकाळी 11.30 वाजता घंटानाद करणार आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेश सचिव सुनील पोतदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पनवेल शहरातील साई नगर खाडीकिनारी मासेमारी करणार्या कोळी बांधवांची घरे असून, सदर घराला सन 2015 पासून वीजपुरवठा दिला गेला होता. परंतु, कोरोना काळात मच्छिमारी व्यवसाय बंद झाल्याने कोळी बांधव आपल्या कोळीवाडा येथील घरी पुन्हा गेले. त्या काळातदेखील महावितरण कंपनीची कोणतीही बिलाची बाकी ठेवली नाही व पुन्हा मच्छिमारी करण्यासाठी आपल्या झोपडीत आले. त्यावेळी तेथील विद्युत प्रवाह खंडित झालेला होता म्हणून कोळी बांधव महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांना भेटून विद्युत प्रवाह पुन्हा सुरूवात करावा, अशी विनंती केली. त्यावेळी अतिरिक्त अभियंता यांनी असिस्टंट इंजिनिअर यांना भेटण्यास सांगितले. त्यप्रमाणे कोळी समाजाने त्यांची भेट घेतली असता नव्याने अर्ज करण्याची सूचना देऊन त्यांना महावितरण कंपनीचे डिपॉझिट भरण्याचे दरपत्रक दिले. त्या दरपत्रकात दाखविलेली रक्कम कोळी बांधवांनी महावितरणच्या तिजोरीत भरणा करूनदेखील त्यांना विद्युत प्रवाह दिला गेला नाही. तो पूर्ववत करण्यासाठी आणि कोळी बांधवांना न्याय देण्यासाठी पनवेल शहर महावितरण कंपनीच्या कार्यालयावर 1 मे रोजी जनता दल (सेक्युलर) घंटानाद करणार आहेत, असे जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश सचिव सुनील पोतदार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.






