पीएम किसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी इ-केवायसी त्वरीत करावी

म्हसळा तहसीलदारांचे शेतकर्‍यांना आव्हाहन
। म्हसळा । वार्ताहर ।
प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांनी इ केवायसी करून घ्यावी असे आव्हाहन म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे. तालुका स्तरावर नियोजन करण्यासाठी दि.27 जुन 2022 रोजी तहसीलदार यांच्या दालनात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला तहसीलदार समीर घारे, नायब तहसीलदार धनराज पाटील, खामगाव मंडळ अधिकारी सलीम शहा, म्हसळा मंडळ अधिकारी रविंद्र उभारे, लिपिक महेश रणदिवे, म्हसळा तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष विजय लाड, सर्व तलाठी, सर्व सीएससी केंद्र चालक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची इ-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवून दि.31 जुलै 2022 पर्यंत इ-केवायसी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्या अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालक (सीएससी) यांच्या मार्फत करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे.

तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा जेणेकरून कोणीही पात्र लाभार्थी या योजनेपासुन वंचित राहू नये यासाठी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्राप सदस्य, गाव अध्यक्ष, महिला मंडळ अध्यक्ष, सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी याबाबत विशेष लक्ष देऊन जनजागृती करण्यासाठी सहकार्य करावे असेही आव्हाहन तहसीलदार समीर घारे यांनी केले आहे.

Exit mobile version