। मुंबई । वृत्तसंस्था ।
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौर्या पार्श्वभूमीवर सेना-भाजप यांच्या वादाला अजून एकदा तोंड फुटले असून, भाजपचे मुंबईप्रेम निव्वळ बेगडी असल्याची टीका शिवसेना खा.संजय राऊत यांनी केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्यानंतर भाजपने अनेक आरोप केले. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मुंबईप्रमाणेच पश्चिम बंगालच्या विकासासाठी योगदान असावं, असं म्हटल्या त्यात चुकलं काहीच नाही. इतर राज्यांचाही विकास व्हावा. पण ममता मुंबई आल्यावर भाजपने तांडव सुरु केलं. ममता मुंबईलुटायला आल्या असे आरोप केले. कुणी पळवले उद्योग, हिंमत आहे का कोणाची उद्योग पळवायची, मुंबईतच राहणार उद्योग असंही राऊत म्हणाले.
याशिवाय, गुजरातचे मुख्यमंत्री हे मुंबईत येऊ शकतात. ते उद्योगपतींना भेटू शकतात. योगी आले त्यांनी नवीन फिल्मसिटी उभारू म्हटलं. इथल्या सिने उद्योगाला आव्हान दिले. तेव्हा भाजपला काही वाटलं नाही का, ममता आल्यावरच पोटशूळ का उठला ते आम्हाला माहिती. तुम्हाला जुलाब का झालं ते महाराष्ट्राला माहिती असल्याचं राऊत म्हणले.
युपीए कुठे आहे असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केल्यानं काँग्रेस नेत्यांनी बोचरी टीका केली आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसं एनडीएसुद्धा नाही. अकाली दल, शिवसेना बाहेर पडले. कुठे आहे एनडीए, एकेकाळी आम्हीही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी परदेशात राहतात यावरूनही टीका झाली. मोदीही परदेशात असतात फक्त कोरोनामुळे ते बाहेर जात नाहीत इतकंच असं म्हणत मोदींवर संजय राऊत यांनी टीका केली.