| खरोशी | वार्ताहर |
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहता बीएलओ कामाची सक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन जीवन देसाई यांना अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आदिनाथ पाटील, सल्लागार प्रमोद पाटील यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सदर बीएलओचे काम दीर्घ कालावधीसाठी व ऑनलाईन करण्याचे असल्याने हे काम करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. कारण, शिक्षकांकडे सद्यःस्थितीत असणाऱ्या कामाचा लेखाजोगा पाहिला तर विद्यार्थी पटनोंदणी ऑफलाईन, ऑनलाईन करणे, दाखलपात्र विद्यार्थी शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करून घेणे, शाळाबाह्य विद्यार्थी शोध घेऊन शाळेत दाखल करून घेणे व ऑनलाईन प्रक्रिया पार पाडणे, कोरोना काळात मागे पडलेल्या विद्यार्थ्यासाठी निपुण भारत कार्यक्रम राबविणे व लिंक भरणे, आदी कामे करत असताना अन्याय होतोय. बीएलओ कामाची जबाबदारी दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होऊन शालेय पटसंख्या कमी होईल, अशी भीती आहे. तरी आमच्या या निवेदनाचा विचार करून बीएलओ कामाची सक्ती करू नये, असे निवेदन अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आले आहे.