| महाड | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जायचे म्हणून दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात कामावर गेलेल्या आदित्य मोरे याचा तो दिवस अखेरचा ठरला. किल्ले रायगडावर जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाड तालुक्यातील चोचिंदे गावातील आदित्य मोरे याचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले.
महाड तालुक्यातील चोचिंदे गावातील आदित्य मोरे हा 22 वर्षाचा तरुण ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत काही महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. 3 नोव्हेंबरला आदित्यला दुपारच्या सत्रात कामावर जाण्याचे नियोजित होते. मात्र किल्ले रायगडावर जाण्यासाठी त्याने दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात कामावर जाण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानेच त्याचा घात केला.
महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत कामावर जाण्यासाठी सकाळीच निघालेला आदित्य मोरे याचा तो दिवस अखेरचा ठरला. घरात एकुलता एक असणारा आदित्य मोरे याच्या अचानक जाण्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्य मोरे यांच्या जाण्याने त्याचे वडील हतबल झाले आहेत. त्यांच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. हे असे अघटीत होईल, असे त्यांना देखील वाटले नव्हते.