बोटी समुद्रकिनार्‍यावर शाकारल्या

कोट्यावधींची उलाढाल ठप्प

। उरण । वर्ताहर ।

1 जून ते 31 जुलैपर्यंत शासनाच्या खोल समुद्रातील पावसाळी 61 दिवसाच्या मासेमारी बंदीच्या आदेशानंतर मासळीची आवक घटली आहे. यामुळे मासळीचे भाव चांगलेच कडाडले आहेत. जिल्ह्याभरातील मासळीचे लिलाव बंद होऊन कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली असून कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणून शाकारणी केली आहे.

करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड, खोपटा व वशेणी गव्हाण आदि बंदरांवर बोटी नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये पाच हजाराहून अधिक मासेमारी नौका आहेत. त्यामध्ये काही नौका यांत्रिकी तर काही बिगर यांत्रिकी आहेत. 31 मे हा मासेमारी हंगामाचा शेवटचा दिवस होता. आता पुढील दोन महिन्यांसाठी या बोटी किनार्‍यावर विसावल्या आहेत. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

बदलते हवामान, सांडपाण्यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण, जेली फिश अशा अनेक समस्यांमुळे मासेमारीवर परिणाम होतो. त्यामुळे मासळीच्या उत्पादनात घट होते. तरी देखील जिल्ह्यातील मच्छीमार सर्व संकटांवर मात करत मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. जून महिन्यात पावसामुळे उधाणाबरोबरच वारा, वादळ मोठ्या प्रमाणात येते. मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अडकून पडण्याचा धोका अधिक असतो. यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच, पावसाळ्यात मासळी प्रजोत्पादन कालावधी असतो. मासेमारी बंदीमुळे मच्छीमारांनी नौका किनारी लावण्यास सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यासह करंजा व मोरा बदरांवर बोटी नांगरण्यात आल्या असून काही ठिकाणी नांगरण्याचे काम अजुनही सुरू आहे.

Exit mobile version