रोजगार, दळी जमीन आणि दरडग्रस्त दाखल्यासाठी आजही प्रतीक्षा
| चौक | प्रतिनिधी |
19 जुलै 2023 च्या काळरात्री इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीने 27 जीव हिरावले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली आणि शेकडो आयुष्यांना कायमची जखम दिली. तीन वर्षांनंतर शासनाने पुनर्वसन करून घरे दिली. मात्र, जीवन उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि दिलेली अनेक आश्वासने अजूनही कागदावरच आहेत. त्यामुळे पुनर्वसित इर्शाळवाडीतील नागरिकांनी शासनाकडे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची भावनिक साद घातली आहे.
माथेरान डोंगररांगेतील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर 19 जुलै 2023 रोजी मध्यरात्री भीषण दरड कोसळली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला, 57 जण बेपत्ता झाले, तर 144 नागरिकांचे प्राण बचावले. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.
दुर्घटनेनंतर चौक-नानिवली येथे दरडग्रस्तांचे 44 घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले. सुरक्षित घरांचा आसरा मिळाला असला, तरी पुनर्वसित वाडीत आजही अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. महावितरणकडून मीटर रीडिंग न घेता अवाजवी वीजबिले पाठविली जात असल्याची तक्रार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने अनेक तरुण बेरोजगार असून, भविष्यासंदर्भात त्यांच्यात अस्वस्थता आहे.
याशिवाय, इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली 262 एकर दळी जमीन अद्याप खातेदारांच्या नावावर करण्यात आलेली नाही. तसेच अनेक दरडग्रस्तांना अधिकृत दरडग्रस्त दाखलेही मिळाले नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत आहेत.
दरम्यान, दुर्घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी, 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नानिवली येथील समाजमंदिराजवळ ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांकडून सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शासनाने प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
सरकारने आम्हाला घरे दिली, त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. पण, केवळ चार भिंती मिळाल्या म्हणजे आयुष्य पूर्ववत होत नाही. आजही स्मशानभूमी नाही, रोजगार नाही, दळी जमिनीचा प्रश्न सुटलेला नाही आणि अनेकांना दरडग्रस्त दाखलेही मिळालेले नाहीत. तीन वर्षांनंतरही आमच्या जखमा ताज्याच आहेत. शासनाने उर्वरित सर्व आश्वासने तातडीने पूर्ण करून दरडग्रस्तांना न्याय द्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.
– कमळू पारधी, इर्शाळवाडी कार्यकर्ते
अजूनही प्रलंबित प्रश्न
पुनर्वसित वाडीत स्मशानभूमीची सुविधा नाही.
मीटर रीडिंगशिवाय अवाजवी वीजबिले पाठविली जात असल्याची तक्रार.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधींचा अभाव.
262 एकर दळी जमीन खातेदारांच्या नावावर करण्याची मागणी.
सर्व दरडग्रस्तांना तातडीने दरडग्रस्त दाखले देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी.





