शेतकऱ्यांना गोकृपामृत व दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक
|चौल |प्रतिनिधी |
रासायनिक शेतीमुळे वाढणारा उत्पादन खर्च, घटणारी जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, अलिबाग यांच्या वतीने चौल येथील पाझर पाटीलवाडा येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात वंदना शिंदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
प्रारंभी कार्यशाळेत नागाव विभागाचे मंडळ कृषी अधिकारी मोहन सूर्यवंशी यांनी गोकृपामृत आणि दशपर्णी अर्क तयार करण्याचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर केले. नैसर्गिक शेतीतील या निविष्ठांचा वापर करून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी श्री शिवकल्याण शेतकरी गट, चौल येथील सदस्यांसह उपस्थित शेतकऱ्यांना गोकृपामृत तयार करण्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचे वाटप करण्यात आले. तब्बल दहा हजार लीटर गोकृपामृत तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. सदरचे साहित्य जिल्हा कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्या हस्ते 50 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यामध्ये गोकृपामृत बनविण्यासाठी 200 लीटरचा प्लॅस्टिक पिंप, दोन किलो काळा सेंद्रिय गुळ, एक लीटर कल्चर, दोन लीटर देशी गायीचे ताक हे साहित्य वाटप करण्यात आले.
दरम्यान, कृषक कल्याणकारी संस्था (चौल)चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र गजानन पाटील यांनी मार्गदर्शन करताना रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक झाल्यामुळे जमिनीचा पोत खालावला असून, पर्यावरणाचे संतुलनही बिघडत असल्याचे सांगितले.
उत्पादनवाढीसाठी मधमाशी पालनाचे महत्त्व अधोरेखित करत पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना हळद व सुरण लागवडीसाठी आवश्यक कंद कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत, नागावचे मंडळ कृषी अधिकारी मोहन सूर्यवंशी, पोयनाडचे मंडळ अधिकारी हिंदूराव मोरे, चौलच्या उपकृषी अधिकारी कविता जामदार, चौलचे कृषीसेवक प्रशांत मुंडे, थळचे कृषीसेवक संतोष टकले आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक थळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र पाटील यांनी केले.
असे तयार करा दशपर्णी अर्क
कडुलिंबाचा पाला 5 किलो, पपई, पेरू, रूई, शेवगा, करंज, आघाडा, कवठ, तुळस, सीताफळ, गुळवेल, निरगुंडी, एरंड, धोत्रा, टणटणी, मिरचीचा ठेचा 2 किलो, लसूण पेस्ट 250 ग्रॅम, शेण 5 किलो, गोमूत्र 5 लीटर. वरील सर्व घटक एकत्र करून आंबविल्यानंतर तयार होणारा दशपर्णी अर्क हा नैसर्गिक कीडनाशक म्हणून प्रभावी ठरतो.
असे तयार करा गोकृपामृत
200 लीटर पाणी, 2 किलो काळा गूळ, 2 लीटर ताक, आवश्यक प्रमाणात गोकृपामृत कल्चर. सर्व घटक एकत्र मिसळून योग्य पद्धतीने आंबविल्यानंतर गोकृपामृत तयार होते. हे नैसर्गिक खत जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि पिकांची वाढ सुधारण्यास उपयुक्त ठरते.







