। चिरनेर । प्रतिनिधी ।
महाड येथील डॉ. आंबेडकर भवन येथे कोमसापचे विश्वस्त साहित्यरत्न रायगड भूषण प्रा.एल.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा ग्रंथोत्सव सोहळ्यात कवी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सर्व कवींनी दर्जेदार कविता सादर करून अतिशय आनंददायी कार्यक्रम सादर केला असल्याचे मत यावेळी प्रा.एल.बी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. जिल्हा ग्रंथोत्सव आयोजक अजीत पवार यांनी सर्व कवींचे स्वागत केले. रंगतदार सूत्रसंचालन राकेश मेहता यांनी केले. कविसंमेलनात ग्रंथ गौरव प्रेम, मैत्री, ग्राम व्यवस्था, लावणी, निसर्ग रंग, गझल, राजकारण इत्यादी प्रकारात आणि विषयावर प्रमाण आणि आगरी बोलीत सुंदर कविता सादर करण्यात आल्या. डॉ. सुभाष कटकदौड, प्रतिक्षा नगरकर, हेमंत बारटक्के, प्रिया शहा, प्रणय इंगळे, जितेंद्र ओक, प्रिया कुलकर्णी, नरेश पाटील, शरद कोरडे, वैभव धनावडे, गंगाधर साळवी, कैलास पिंगळे, प.सा. पाटील, इत्यादी कवींसह प्रा.एल बी यांनी शेवटी सुरेल आवाजात आणि विनोदी ढंगात आगरी बोलीत ‘इवान’ ही कविता सादर करून श्रोत्यांना मनमुराद हसविले.







