| पुणे | प्रतिनिधी |
आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ परिसरातील उदारमळा येथील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) डाव्या कालव्यावरील पूल कोसळला आहे. ही घटना सोमवार दि. 2 रोजी घडली. सुदैवाने पुलावर कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
महाळुंगे पडवळ येथील उदारमळा, बेंदवस्ती, घायाळमळा, आंबटकर, ठाकरवाडीतील नागरिकांना कालव्यावरील पूल हा महाळुंगे पडवळ गावात ये-जा करण्यासाठी कालव्यावरील पूल एकमेव रस्ता आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत 90 साली पुलाचे बांधकाम केले होते. या पुलावरून दररोज जवळपास मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात. यात विशेषतः शेतीमाल व दूध वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते तसेच परिसरातील नागरिक व शाळकरी मुलांची या पुलावरून वर्दळ असते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा शेती व दुग्ध व्यवसाय असल्याने हा पूल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गवळ्यांना दूध गाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. पुलाचा राडारोडा पाण्यात कोसळल्यास कालवा फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
डिंभे कालव्यावरील पूल कोसळला
