अंबा नदीवरील पुलांचे काम रखडले

गणेशभक्त, प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

। पाली । प्रतिनिधी ।

पाली- खोपोली राज्य महामार्गावरील पाली, भालगुल व जांभुळपाडा या नवीन पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन प्रवास सुखकर होणार, अशी आश्‍वासने एमएसआरडीसी व लोकप्रतिनिधिंनी छातीठोकपणे दिली होती. मात्र ती पाण्यात विरघळी आहेत. आजही येथील धोकादायक पुलांवरून वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे, आंबा नदी पुलावरून यंदाही पाणी गेल्यामुळे तासन्तास इथली वाहतूक खोळंबली. त्यामुळे नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक जुन्या व धोकादायक पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. यावेळी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या पुलांना अधिक मजबूत व क्षमतेचे करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील 5 वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या मार्गावर पाली, भालगुल व जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील नवीन पुलांचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी, जुन्या धोकादायक पुलांवरून सध्या वाहतूक सुरू आहे.

दरवर्षी पावसाळ्यात पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक देखील खोळंबते. यामुळे प्रवासी, चाकरमानी व वाहन चालकांची खूप गैरसोय होते. पाली-खोपोली मार्ग सुस्थितीत यावा, येथील पूल नव्याने बांधण्यात यावेत, यासाठी वारंवार आंदोलने केली गेली. मात्र प्रशासनाकडून कोणतीही जलद कार्यवाही करण्यात आली नाही.
या ठिकाणी तब्बल 25 कोटीच्या निधीतून अधिक क्षमता, रुंदी आणि उंचीचे पूल तयार होत आहेत. या तिन्ही ठिकाणचे एका बाजूचे पूल जून महिन्यात पूर्ण होऊन तेथून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते. मात्र कामगार उपलब्ध नसणे, ठेकेदाराचे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे पुलांचे काम मागील अनेक महिन्यांपासून जैसे थे आहे.

पूल लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. ते पूल कमकुवत होऊन वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. त्यामुळे वेळीच नवीन पुलाची निर्मिती होणे गरजेचे होते. हे नवीन होणारे पूल दर्जेदार व लवकर पूर्ण झाले पाहिजेत. मात्र या पुलाचे काम अद्याप रखडल्याने संताप व्यक्त होत आहे.

क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक
पाली, जांभुळपाडा व भालगुल येथील पुलांची केवळ एकोणीस टन भार पेलण्याची क्षमता आहे. मात्र या पुलांवरुन साठ टनाची वाहतुक होत आहे. त्यामुळे हे पूल दिवसेंदिवस कमकूवत व धोकादायक होत आहेत. यावर्षी देखील पावसाळ्यात अंबा नदी पुलावरून पाणी गेले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. तसेच पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याबरोबरच क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे वाहन जाणे, पुलावरील खड्डे यामुळ पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. नवीन पुलामुळे येथून प्रवास करणे सुरक्षित व सुलभ होणार आहे. मात्र हे काम रेंगाळले असल्याने नागरिक व प्रवासी संतप्त झाले आहेत. पाली येथील अंबा नदी पुल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने जाणारे प्रवासी, वाहने व मालवाहू वाहने याच मार्गावरून जातात. येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व अवजड वाहनांची वाहतूक होते. वाहतुकीच्या दृष्टीने हा पुल अत्यंत धोकादायक झाला आहे. खड्ड्यात असंख्य वाहने आदळत आहेत. पादचार्‍यांना देखील पुलावरून जीवावर उदार होऊन वाट काढावी लागते.

वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. संरक्षण कठड्यांअभावी येथे अपघाताची शक्यता आहे. येथील नवीन पुलाचे काम वेळीच होणे गरजेचे होते. मात्र त्यामुळे आता वाहन चालक, प्रवासी व पादचारी यांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. शिवाय पुलावरून पाणी गेल्यामुळे प्रचंड गैरसोय होते. नवा पूल होईपर्यंत किमान या जुन्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी.

कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली

असे आहेत नवीन पूल
अंबा नदीवरील नवीन पुलाची उंची 16 मीटर असणार आहे. तर लांबी 110 मीटर तसेच जांभूळपाडा पूलाची उंची 16 मीटर, लांबी 70 मीटर इतकी आहे. भालगूल पूलाची उंची देखील 16 मीटर तर लांबी 55 मीटर असणार आहे. हे तिन्ही पूल चार लेनचे होणार आहेत.

Exit mobile version