| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटविली असून, शर्यतींवर बंदी घालणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तब्बल बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडी शर्यतींच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून, शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा आहे. या निर्णयानंतर रायगड जिल्ह्यातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडी मालक, चालक व प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता यापुढे बैलगाडीचा धुरळा अधिक जोमाने उडणार असून, बक्षिसांचीदेखील लयलूट होण्याची शक्यता आहे.
बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. एक वेगळी संस्कृती म्हणून या खेळाकडे पाहिले जाते. या शर्यतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. 2011 मध्ये बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी न्यायालयाने बंदी हटवून अटी-शर्ती लागू करीत शर्यतींना मान्यता दिली. राज्य सरकारने विधिमंडळात बैलगाडी शर्यतीला मंजुरी दिली होती. याला विरोध करीत काही प्राणीप्रेमी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीत बैलगाडी शर्यतीला परवानगी देणाऱ्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने रायगड जिल्ह्यामध्ये बैलगाडीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवून सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनीदेखील जिल्हास्तर हा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
शर्यतींना कधी होते सुरुवात
रायगड जिल्ह्यामध्ये भातकापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबर महिन्यापासून बैलगाडी शर्यतीला सुरुवात होते. काही ठिकाणी एप्रिलपर्यंत तर काही ठिकाणी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बैलगाडी शर्यती सुरू असतात. बैलगाडी शर्यतीबद्दल आकर्षण वाढल्याने बक्षीसदेखील वाढू लागले आहेत. लाखोंच्या घरात बक्षीसे आयोजकांकडून दिली जातात. बैलांना प्रचंड महत्व वाढू लागले आहे. बैलांच्या किंमतीतदेखील वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळू लागले आहे.
बैलगाडा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी बैलावर खूप प्रेम करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे व न्यायालयाचे आभार व्यक्त करतो. आजचा दिवस हा आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा आहे.
अजय म्हात्रे, अध्यक्ष, अलिबाग-मुरुड बैलगाडी संघटना
काय आहे प्रकरण?
तामिळनाडूतील जलीकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवर 2011 मध्ये बंदी घालण्यात आली होती. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत, या अटीवर बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. या शर्यतींमध्ये पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील दाखवला.