मंत्रालयाजवळ आंदोलन करण्याचा इशारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील शेतकरी संकटात असताना, शेतकर्यांच्या जमिनी हडप करणारा, शेतकर्यांसह स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा नैना प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या अधिवेशनात केली. तसेच बुधवारी (दि.15) शेतकर्यांच्या आंदोलनाचा शेवट झाल्यानंतर सर्वजण मंत्रालयाजवळ आंदोलन उभं करु, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
आ. जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या भाषणात, नैना प्रकल्पाला विरोध करत नैना प्रकल्पाचे धोरण हे चुकीचे असल्यामुळे हा प्रकल्प शेतकर्यांना व स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा असल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पाला विरोध करत नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.
यापुढे आ. जयंत पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प सुरु आहेत. त्यापैकी नैना प्रकल्प हा शेतकर्यांना आणि स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा प्रकल्प आहे. याबाबत गेली तीन ते चार वर्षे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, अद्यापही शासनाने कोणीही ठोस पावले उचलली नाहीत.
कोणत्याही मोबदल्याशिवाय पनवेल, कर्जत, खालापूर आणि परिसरातील 224 गावांतील शेतक्यांच्या 474 चौरस किलोमीटर अंतरावरील पिकत्या जमिनी नैना प्रकल्पांसाठी लाटण्याचा घाट घातला आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना एकतर्फी निर्णय घेऊन त्या जमिनीवर शासनाने हक्क सांगणे हे हुकूमशाहीचे संकेत असल्याने शेतकर्यांची पुढची पिढी अडचणीत आली आहे.
परिसरात गावबंदीचे आंदोलन
शासनाच्या जाचक निर्णयामुळे स्थानिक ग्रामीण भागातील लोकांनी रोज एक गावबंदीचं आंदोलन सुरु केलं आहे. नावडे, तळोजासारखी गावे एक दिवसआड निषेधार्थ बंद आहेत. त्यामुळे परिसरात वेगळं वातावरण निर्माण झाले आहे. नैनामुळे अतोनात नुकसान होत आहे. अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.