हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग
। गडब । वार्ताहर ।
अलिबाग समुद्रकिनारी शनिवारी (दि. 1) झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील गडब गावातील तरुण मितेष जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीकरिता तसेच प्रशासनाकडे घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी रविवारी (दि. 8) सायंकाळी शांततेच्या मार्गाने कँडल मार्चचे आयोजन केले होते. यामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महिला व लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
या कँडल मार्चमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, गडब सरपंच माणसी पाटील, उपसरपंच दिपक कोठेकर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गांवड, शिवसेनेचे पेण विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, डोलवी ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम म्हात्रे, भाजपचे युवा नेते ललित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, युवासेनेचे कासु विभाग प्रमुख निशांत पाटील, माजी सरपंच अर्पणा कोठेकर, विजय पाटील, माजी उपसरपंच तुलशिदास कोठेकर, दिनेश म्हात्रे, मानव अधिकारी समितीच्या पेण तालुका अधक्षा अश्विनी ठाकूर, पत्रकार विजय मोकल, आदर्श युवा संघटनेचे संचालक के.पी. पाटील, अध्यक्ष के.जी. म्हात्रे, सचिव कमलेश ठाकूर आदींसह हजोरो नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करुन मितेशला न्याय मिळाला पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मितेशला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार आसल्याचे उपस्थितांनी सांगून, त्याला श्रद्धांजली वाहिली.







