| माणगाव । वार्ताहर ।
माणगावपासून दोन किमी अंतरावर असणार्या खरवली फाट्याच्या पुढे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारची रिक्षाला धडक लागून झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. सदरील अपघात मंगळवार (दि.15) रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची फिर्याद रिक्षाचालक आशिष शांताराम पवार (वय-30) रा.पुनाडेवाडी ता.महाड (सध्या रा.विलेपार्ले पश्चिम) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, एमएच 01 बीजी 5989 या गाडीवरील चालक आरोपी अनिल अनंतराव धनवट (वय-46) रा. भांडुप वेस्ट मुंबई याने त्याच्या ताब्यातील हि कार माणगाव बाजूकडून मुंबई बाजूकडे घेऊन जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने येऊन मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जात असलेली रिक्षा क्रमांक एमएच 02 इ डब्लू 6101 या गाडीस समोरून धडक देऊन अपघात केला. या अपघातात रिक्षाचालक पवार (वय-30), संजय दगडू भिलारे (वय-52), प्रदीप सदाशिव पवार (वय-50), प्रमिला प्रदीप पवार (वय-48) सर्व रा.पुनाडेवाडी ता.महाड हे चार जण जखमी झाले. या सर्व जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे करीत आहेत.