सावधान इंडिया….लाईफ इज शॉर्ट…. आयुर्मान नऊ वर्षांनी घटणार

ईपीआयसी अहवालातून माहिती समोर
मुंबई | प्रतिनिधी |
येत्या काळात वायू प्रदूषणामुळे सुमारे 40% भारतीयांचे आयुर्मान नऊ वर्षांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) बुधवारी यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे 48 कोटी लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात. तसेच, गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाली आहे.
प्रदुषण रोखण्यासाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं (एनसीएपी) ईपीआयसीने कौतुक केलंय. ईपीआयसीच्या अहवालात म्हटले आहे की एनसीएपीचे साध्य करणे आणि टिकवून ठेवणे या कार्यक्रमामुळे देशाचे एकूण आयुर्मान 1.7 वर्षे आणि नवी दिल्लीतील लोकांचे आयुर्मान 3.1 वर्षांनी वाढवण्यास मदत होईल. 2024 पर्यंत सर्वात प्रदुषित 102 शहरांमध्ये 20 ते 30 टक्क्यांपर्यंत प्रदूषण कमी करणे, हे एनसीएपीचे लक्ष्य आहे. यासाठी औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये कपात, वाहतूक इंधन आणि बायोमास जाळण्यासाठी कडक नियम लागू करणे आणि धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी काम करणे, याचा समावेश आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी चांगल्या मॉनिटरिंग सिस्टिमची आवश्यकता असेल.
2020 मध्ये सलग तिसर्‍या वर्षी नवी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी होती. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले. या काळात नवी दिल्लीच्या 2 कोटी लोकांनी प्रदुषणरहित स्वच्छ श्‍वास घेतला. त्यानंतर जवळच्या पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकर्‍यांनी शेतातील तण जाळल्यामुळे पुन्हा हिवाळ्यात दिल्लीतील प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आयुर्मानाची आकडेवारी काढण्यासाठी ईपीआयसीने दीर्घकालीन वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांना सामोरे जाणार्‍या लोकांच्या आरोग्याची तुलना केली होती.
ईपीआयचीच्या निष्कर्षांनुसार, शेजारील बांगलादेशने जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या पातळीवर हवेचा दर्जा सुधारल्यास तेथील सरासरी आयुर्मान 5.4 वर्षांनी वाढू शकते.

Exit mobile version